BJP Devendra Fadnavis On MNS Raj Thackeray: मुंबई: 2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. मला वाटाघाटीमध्ये पाडू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली. राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या घोषणेनंतर राज्यातील विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे.
आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मोदी पंतप्रधान व्हावे हे मी सर्वात प्रथम मी बोललो. ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या पटल्या नाहीत. मी एखाद्या गोष्टीवर टोकाचे प्रेम करतो. विरोध पण टोकाचा करतो. मी महाराष्ट्रावर टोकाचे प्रेम करतो. पाच वर्षात ज्या गोष्टी पटल्या त्याचे अभिनंदन केले. ज्या गोष्टी पटत नाही त्याचा टोकाचा विरोध केला. विश्वास टाकला तर मी टोकाचे प्रेम करतो. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोध करतो. स्वर्थासाठी कधीच विरोध केला नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले.
येणारी निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी
देशात सर्वाधिक तरुण आपल्याकडे आहे. देशाचे तरुण हेच देशाचे भविष्य आहे.देशातील तरणांकडे मोदींनी लक्ष द्यावे. महाराष्ट्राला मोठा वाटा हवा, ही मोदींकडून अपेक्षा आहे. येणारी निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. महाराष्ट्रात चुकीचा कॅरम फुटला आहे. देशातील उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये, अशी अपेक्षा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.