Delhi Assembly AAP Protest: दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) सरकारने जाहीर केले आहे की, त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार आज रात्री विधानसभेत थांबतील आणि नायब राज्यपालांचा विरोध करतील. याबाबत माहिती देताना आपचे आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले की, आज रात्री सर्व आपचे आमदार सभागृहात राहतील. आम आदमी पक्षाने दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना (VK Saxen) यांच्यावर नोटाबंदीच्या काळात 1400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले की, संध्याकाळी सर्व आमदार महात्मा गांधी पुतळ्याखाली बसतील आणि रात्रभर विधानसभेत राहून नायब राज्यपालांचा निषेध करतील.


सोमवारी दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष असताना 1400 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पक्षाने आपल्या आरोपात म्हटले आहे की, विनय कुमार सक्सेना यांनी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष असताना नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी जुन्या नोटा नव्या नोटांमध्ये बदलून घोटाळा केला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावावर 1400 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आपने केला आहे.


दुर्गेश पाठक म्हणाले की, नोटाबंदीच्या काळात लाखो लोकांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आणि लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यावेळी नायब राज्यपाल 1400 कोटींचा घोटाळा करण्यात व्यस्त होते. एलजी विनय सक्सेनाचा घोटाळा ज्यांनी उघडकीस आणला ते अत्यंत गरीब होते. पण त्यांनी धीर सोडला नाही. प्रत्येक मंचावर तक्रार करून आमच्याकडून चुकीचे काम करून घेतेले जात असल्याचे ते म्हणाले आहेत. असे असतानाही राज्यपालांनी स्वत:च तपासाची धुरा सांभाळली. दोन्ही तक्रारदारांना निलंबित करून त्यांच्या भ्रष्ट साथीदारांना बढती देण्यात आली.


नायब राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी


दिल्लीच्या नायब राज्यपालांवर ईडीने छापे टाकावेत, अशी मागणी दुर्गेश पाठक यांनी केली आहे. हे मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. विनय कुमार सक्सेना यांच्याविरोधात चौकशी होईपर्यंत त्यांना नायब राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना राज्यपालांच्या पदावरून हटवण्यात यावे. दरम्यान, या आरोपांवर आप आमदारांनी खादी ग्रामोद्योगशी संबंधित हे प्रकरण उघड करणाऱ्या दोन रोखपालांची विधानेही जारी केली आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Mamata Banerjee Slams BJP: महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला, ममता बॅनर्जींचा भाजपला सवाल
Namaz Controversy : 'मुस्लिम आता घरातही नमाज अदा करू शकत नाहीत, मुस्लिमांना अशी वागणूक कधीपर्यंत? ओवेसींचा PM मोदींवर निशाणा