Aaditya Thackeray Letter To Worlikar : राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि मुंबईतील (Mumbai) वरळी (Worli) मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी वरळीकरांना पत्र पाठवलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. विकासकामं झाल्यानेच वरळीकरांना हेवा वाटतोय, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्राट म्हटलं आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख न करता आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे. 


पत्र लिहिण्याचा उद्देश
आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन पोहोचवत आहेत. मी वरळ ए प्लसचं वचन दिलं होतं आणि यामुळे अनेक कामं केली आहेत. अशाप्रकारची कामं केल्यानंतर विरोधकांना सुद्धा हेवा वाटावा असा विकास वरळीचा झाला आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षाला वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो, असं इथल्या बॅनरवरुन दिसतं.




आदित्य ठाकरे यांनी पत्रात काय लिहिलंय?
महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहेत. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+चे वचन दिले होते. गेल्या तीन वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एकसंघ म्हणून काम करत आहोत.


नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो किंवा सामुदायिक स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राईव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो, आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत.


म्हणूनच राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षाला देखील वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष, त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करते आणि त्यांना देखील वरळीत यावंतसं वाटतंय.


यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करुन लोकहिताचा विचार करणारं सरकार पाडलं गेलं. पण आम्हाला नि:स्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहिल.


जय हिंद ! जय महाराष्ट्र!"


आपला नम्र
आदित्य रश्मी उद्धव ठाकरे


निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे पहिले ठाकरे!
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे ते पहिले ठाकरे ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि ते विधानपरिषदेवर निवडून गेले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आदित्य ठाकरे कॅबिनेटमंत्री बनले. 30 डिसेंबर 2019 रोजी आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पर्यटन, राजशिष्टाचार आणि पर्यावरण मंत्री म्हणून शपथ घेतली.