परभणी : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर (Winter Session) धनगर समाजाकडून काल मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा संपवुन परतत निघालेल्या परभणी जिल्ह्यातील मोर्चेकऱ्यांच्या गाडीला झालेल्या अपघतात दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पालम येथील सरफराजपुर गावातील काहीजण या मोर्च्याला गेले होते. दरम्यान, परत येत असतानाच रात्री तीन वाजेच्या सुमारास माहूरजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. लक्ष्मण पंडितराव वाघमारे आणि रमेश दत्तराव वाघमारे असे मयत व्यक्तीचे नावं आहे. 


अधिक माहितीनुसार, परभणीच्या पालम तालुक्यातील सरफराजपुर गावातील अनेकजण धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) मिळावे यासाठी नागपुर येथे काढलेल्या मोर्चासाठी गेले होते. मोर्चा झाल्यानंतर हे सर्वजण परत गावाकडे निघाले होते. दरम्यान, रात्री तीन वाजेच्या सुमारास माहूरजवळ या मोर्चेकऱ्यांच्या गाडीला पाठमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. ज्यात गाडीत असलेले मोर्चेकरी गंभीर जखमी झाले. यात, रंगराव संपतराव वाघमारे, राम बालाजी बनसोडे, बापूराव मारोती वाघमारे हे अपघातात गंभीर जखमी झाले. तर, लक्ष्मण पंडितराव वाघमारे आणि रमेश दत्तराव वाघमारे या दोघांचा दुर्दैवी अपघातात निधन झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन, या घटनेमुळे सरफराजपुर गावात शोककळा पसरली आहे.