विरार: दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन  (Ganesh Visarjan 2023) करताना विरारमध्ये एका गणेश भक्तांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. विरार पूर्व पारोळा- शिरवलीच्या नदीत बुधवारी रात्री 8 वाजता ही घटना घडली. पाच तासानंतर रात्री उशिरा मृतदेह शोधण्यात स्थानिक नागरिक आणि पोलिसांना यश आले. संजय हरिश्चंद्र पाटील (वय 45) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या गणेशभक्ताचे नाव असून ते पारोळा गावचे राहणारे होते. या घटनेमुळे पारोळा, शिरवली परिसरातील गणेश भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


स्वतःच्या घरच्या दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे नदीत विसर्जन करून, दुसऱ्या मूर्तीचेही विसर्जन करताना ही घटना घडली. अचानक त्यांना नदीतील वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले होते. ही घटना गणेशभक्त आणि पोलिसांना कळताच त्यांनी आहोरात्र कार्य करून रात्री उशिरा पाच तासानंतर मृतदेह शोधण्यात यश मिळविले आहे. 


पालघरच्या वाडा येथे तिघांचा मृत्यू 


पालघर वाडा येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गोऱ्हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य (वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (25) अशी कोनसई येथील नाल्यात बुडालेल्यांची नावं आहेत. तर प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) याचा गोऱ्हे येथील तलावात बुडून मृत्यू झाला. 


विसर्जन करताना काळजी घ्या


गणेश विसर्जन दरम्यान गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचतो. राज्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. त्यामुळे शहरी भागात नाही पण ग्रामीण भागातच अधिकच्या दुर्घटना घडल्याचं दिसून येतं. गणेश भक्तांकडून कित्येक वेळेस नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तर शहराप्रमाणे पोलिस बंदोबस्तही नसतो. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी कमी असूनही अशा दुर्घटना अशा प्रकारच्या घडतातच. सध्या गणेशोत्सवामुळे लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. काही जणांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो. त्यामुळे बुधवारी काहींनी गणेशाचे विसर्जन केले. पण, वाडा येथे दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जन करताना काळजी घेण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे. 


ही बातमी वाचा: