पालघर :  आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत असल्याचं प्रकार पुढे येत आहे. विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे. 


 शासकीय आश्रमशाळा साखरे येथे खुडेद (कुडाचा पाडा) येथील इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीने आश्रमशाळेतील वसतिगृहात आज 12 ते  3 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.  या बाबत विक्रमगड पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु असुन अधिक तपास पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिते करत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.  तपासानंतर आत्महत्येचे कारण कळेल असे प्रदीप गिते यांनी सांगितले. 


 मात्र शाळा सुरु होण्याच्या वेळेतच आत्महत्या कशी होते?आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे येथील विध्यार्थ्यांवर लक्ष नाही का? असा प्रश्न या विद्यार्थीनींच्या पालकांनी उपस्थितीत केला आहे.


साखरे येथील शासकीय आश्रम शाळेत यापूर्वी घडल्या अनेक घटना


2016 मध्ये या आश्रम शाळेत विद्यार्थिनीला ताप येऊन मृत्यू झाला होता. तर अनेक वेळा सर्पदंश व इतर घटना या आश्रम शाळेत घडल्या आहेत. ही आश्रमशाळा नेहमीच चर्चेत असून या आश्रम शाळेकडे आदिवासी विकास प्रकल्पकडून नेहमी दुर्लक्ष होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.


संबंधित बातम्या :