पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यातच पालघरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालघर (Palghar) जिल्हा निर्मितीला तब्बल दहा वर्ष उलटले आहेत, मात्र अजूनही तिथे मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. पालघरमधील एका पाड्याला स्मशानभूमी (Cemetery) नसल्याने सरणावर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार (Funeral) करण्याची वेळ नागरिकांना आली आहे. माणसाने वेदना सोसाव्या तरी किती? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 


पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच एखादी दुर्घटना घडली की, नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. पालघर जिल्हा निर्मिती होऊन अनेक वर्ष उलटले आहेत. मात्र या जिल्ह्यातील मुलभूत सोयी-सुविधांचा बोजवारा पुन्हा एकदा उडाल्याचे दिसून आले आहे.  


चक्क सरणावर ताडपत्री पांघरुन अंत्यसंस्कार


पालघरमधील पाड्याला स्मशानभूमी नसल्याने सरणावर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. डहाणूच्या सोनाळे खुबरोडपाडा येथील धक्कादायक घटना आहे. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या 56 वर्षीय जयराम झिरवा यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. यावेळी नातेवाईकांना प्लास्टिक खाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचे दिसून आले आहे. अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांसह गावकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. महसुली गावाची असलेली स्मशानभूमी पाड्यापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे मुसळधार पावसात प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ उद्भवली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 


पालघरमध्ये 27 विद्यार्थ्यांना विषबाधा 


दरम्यान, पालघर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. श्रावणातील पहिला सोमवारी रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यानंतर आश्रमशाळेतील सर्वजण झोपी गेले. मात्र, मंगळवारी पहाटे आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना मळमळ होऊ लागली. त्यानंतर 27 विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. या सगळ्यांना तातडीने नजीकच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा (Food Poisining) झाल्याचे निष्पन्न झाले. या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


आणखी वाचा 


पालघर जिल्ह्यात माता, बालमृत्यूचं ग्रहण सुटेना, गेल्या 11 वर्षातील चिंताजनक आकडेवारी आली समोर