Bharati Pawar : आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची पोलखोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी केली आहे. भारती पवार उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात (Osmanabad District Hospital) गेल्या असता, शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यांना खासगी रुग्णालयातून औषधं खरेदी करण्यास सांगितली. यावरुनच भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. तर नागरिकांनी देखील यावेळी अनेक तक्रारी केल्या. 


तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्य मंत्री आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पोलखोल केली आहे.  शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्याचे  समोर आलं आहे. जिल्हा रुग्णालयाकडून खासगी मेडिकलमध्ये जाण्याचा सल्ला भारती पवार यांना देण्यात आला. त्यानंतर मंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे. 


नेमकं काय म्हणाल्या भारती पवार?


केंद्र सरकारनं काही नियम ठरवून दिले आहेत. त्या नियमांनुसार प्रत्येक शासकिय रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध असली पाहिजेत. प्रत्येक राज्याच्या मागणीनुसार औषधांसाठी बजेट दिलं जात असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या. जेव्हा मी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली तेव्हा लक्षात आले की, तिथे काही औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळं तत्काळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत तत्काळ औषधांची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली. रुग्णांना बाहेरुन औषधे विकत न आणण्याची वेळ येऊ नये अशाही सूचना दिल्या आहेत. आमचा आग्रह आहे की, सगळी औषधे रुग्णालयात मिळाली पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.


योजनांचा आढावा घेण्यासाठी भारती पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर


मी स्वत:पेशंट म्हणून काही ठिकाणी अचानक भेटी देत आहे. तेथील परिस्थिती समजून घेत असल्याचे मंत्री भारती पवार म्हणाल्या. ग्राऊंड लेवलवर नेमकं काम कसं चाललं आहे पाहणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळं ठिकाठिकाणी भेटी देऊन माहिती घेत असल्याचे भारती पवार म्हणाल्या. जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी भारती पवार या जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर काही रुग्णांनी आम्हाला काही औषधे मिळत नाहीत, ती बाहेरुन घ्या असे कर्मचारी सांगतात अशी तक्रार केली. तेव्हा भारती पवार या तत्काळ औषध वाटप होत असलेल्या रुग्णांच्या रांगेत औषध घेण्यासाठी थांबल्या. त्यांचा नंबर आल्यानंतर संबधित कर्मचाऱ्याने रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Air service : नाशिकच्या विमानसेवेसाठी काहीही! मंत्री भारती पवार यांचे वाहतूक मंत्रालयाला साकडे