31 वर्षांपूर्वी 19 मार्च रोजी साहेबराव करपे या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली होती. जाहीररित्या झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. नंतरच्या काळात हजारो शेतकरी आत्महत्या झाल्या. सरकारे बदलली, पण शेतकऱ्याचे मरण थांबले नाही. त्यामुळेच शेतकऱ्याच्या वेदनेशी नाते जोडण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
दरम्यान, करपे कुटुंबियांनी आत्महत्या केलेल्या चिलगव्हाण गावातही गावकऱ्यांकडून चूलबंद आंदोलन करण्यात येतंय. करपे कुटुंबियांच्या वाड्यासमोर काळी रांगोळी काढून गावकऱ्यांकडून उपोषण करण्यात येतंय. शेतकरी नेते अमर हबीब, खासदार राजू शेट्टी ,राज्यमंत्री रविकांत तुपकर, शेतकरी नेते वामनराव चटप आणि चंद्रकांत वानखेडे याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतलं नियोजन कसं आहे?
मुंबईत उपवास सोडण्यासाठी चर्चगेट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरील मनोरा आमदार निवासाजवळ संध्याकाळी 5 वाजता उपोषणातील सहभागी कार्यकर्ते जमणार आहेत. शेतकरी आत्महत्यांशी सहवेदना आणि शेतकरी कायद्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईतही मोठा सहभाग पाहायला मिळतो आहे.
अमर हबीब यवतमाळमध्ये उपोषणाला बसणार
किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी उपोषणाची हाक दिली असून, ते स्वत:ही या उपोषणात सक्रिय सहभाग घेणार आहेत. अमर हबीब हे यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये उपोषणाला बसणार आहेत. ज्यांना महागावला जाणं शक्य आहे, त्यांनी तिथेही सहभागी होऊन पाठिंबा दर्शवण्याचं आवाहन अमर हबीब यांनी केलं आहे.
अमर हबीब यांनी काय आवाहन केलं?
“19 मार्च रोजी होणारे उपोषण हे कोणा पक्षाचे नाही. कोणा संघटनेचे नाही. शेतकऱ्याविषयी संवेदना असणाऱ्या प्रत्येकाचे आहे. तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बसायचे असेल तर जरूर बसा. बसायचे नसेल तर बसू नका. पण त्या दिवशी उपोषण मात्र करा.”, असं जाहीर आवाहन अमर हबीब यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती : अमर हबीब
“शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. या आपत्तीच्या वेळेस आपण आपले किरकोळ मतभेद बाजूला ठेवूया. सारा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या बाजूने उभा ठाकला तरच मरणाच्या दारावर उभा राहिलेला शेतकरी मागे फिरेल आणि सरकारलाही शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे भाग पडेल.”, असेही अमर हबीब यांनी सांगितले.
शरद जोशींचे सहकारी म्हात्रे सरांचाही सहभाग
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू सहकारी प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे हेही या उपोषणात सहभागी होणार आहेत. 19 मार्च रोजी होणाऱ्या उपोषण आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
शरद जोशी परदेशातून आल्यानंतर पुण्यातील आंबेठाण येथे शेती करू लागले. पुढे हेच आंबेठाण शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनले. सुरेशचंद्र म्हात्रे हे याच ठिकाणाहून उपोषणात सहभागी होणार आहेत. बाहेर जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याने सुरेशचंद्र म्हात्रे घरी राहूनच उपोषण करणार आहेत.
उपोषणाची तारीख 19 मार्च का?
साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनीही वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. उदरनिर्वाहाचे साधन शेती. शेती परवडत नाही. दरवर्षी तोटाच होतो. घेतलेली कर्जे फेडता येत नाही, लाईटचे बिल भरता येत नाही, हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नाही. म्हणून अस्वस्थ होते.
एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवनार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. सकाळी त्या एका खोलीतून सहा शव काढावे लागले. साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे असे नमूद केले होते. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते.
साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या व धोरणे बदला अन्यथा अशा आत्महत्त्या रोज होतील असा इशारा दिला होता.
ही पहिली जाहीर झालेली शेतकऱ्याची आत्महत्या. ती साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी केली होती. या 19 मार्चला त्यास 31 वर्ष होतात. म्हणून उपवासासाठी 19 मार्च ही तारीख निवडण्यात आली असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली.
उपोषणाबाबत अमर हबीब यांची भूमिका