मुंबई : राजकारणात अनेकजण निवडणुका हरतात, पण काहीजण कारणं सांगत दुसऱ्यांना दोष देतात. दुनिया झुकती है, लेकिन झुकानेवाला चाहिए, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वकीयांना मोलाचा सल्ला दिला आहे. औरंगाबादेत औद्योगिक प्रदर्शनाला गडकरींनी भेट दिली. कटआऊट लावून कुणी नेता होत नाही, आपण आयुष्यात कधीही कटआऊट लावले नसल्याचंही गडकरी म्हणाले.


नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, देश स्वतंत्र झाला तेंव्हा तीन प्रमुख विचारधारांचा काळ आला. पहिली विचारधारा समाजवाद. समाजवादी विचाराचे असणे अभिमानाचा विषय होता. दुसरी विचारधारा होती, कम्युनिष्ट विचारधारा, ती सुद्धा बदलत गेली. चीनने ही विचारधारा बदलली. तिसरी होती ती भांडवलवादी विचारसरणी. मात्र या तिन्हीही विचारधारेने आपली समृद्धी झाली नाही. हे काळाच्या सचोटीवर सिद्ध झाले, असे ते म्हणाले. आपल्या देशाचा विकास होत असताना सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे असे आपण म्हणतो. तशी आर्थिक समानता सुद्धा तयार झाली पाहिजे, त्यामुळे गरीब पीडित माणसाला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरण ठरवले पाहिजे, असे ते म्हणाले.

हेही वाचा- CAA मुस्लीमविरोधी नाही, काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध रहा : नितीन गडकरी

यावेळी त्यांनी राजकारणी लोकांना सल्ला देखील दिला. ते म्हणाले, राजकारणात अनेक जण निवडणूक हरतात, पण अनेक जण कारण सांगतात दुसऱ्यांना दोष देतात. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, तुमच्यात क्वालिटी असेल तर तुमचे उत्पादन खपते. राजकारणात सुद्धा असंच असतं. मी माझ्या आयुष्यात 20 रुपये खर्चून कधी कुणाचे कट आउट लावले नाही. कटआऊट लावल्याने नेता होत नाही, उत्तम उत्पादन असले की ते बरोबर खपते, नेता उत्तम असला की तो कुण्या जातीचा धर्माचा आहे याचा काही फरक पडत नाही, असेही गडकरी म्हणाले.

संबंधित बातम्या 

सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे भविष्याची कोणतीही चिंता न करणे : नितीन गडकरी 

महाविकासआघाडी राज्याला स्थिर सरकार देऊ शकत नाही : नितीन गडकरी 

कुठलं सरकार किंवा मुख्यमंत्री बनवणं 'आपलं' उद्दिष्ट नाही : नितीन गडकरी