नाशिक : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या विरोधात हल्लबोल आंदोलन सुरु केलेलं असताना दुसरीकडे  चोरट्यांनी याच आंदोलनात डल्लामार मोहीम सुरु केली. नगरपासून निफाडपर्यंत जिथे-जिथे राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा धडकला त्या प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चोरट्यांच्या हातसफाईचा सामना करावा लागला.


यावेळी कोणाची सोनसाखळी चोरीला गेली, कोणाची रोख रक्कम तर कोणाच्या खिशातला मोबाईलच. यातून नाशिकचे जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारीही सुटले नाही.

एका कार्यकर्त्याला तर धनंजय मुंडे यांचे भाषण 12 हजार रुपयांत पडले, खास मुंडेंच भाषण ऐकण्यासाठी आलेल्या संजय उगलमुगलेंच्या खिशातून त्यांचा  मोबाईलच चोरीला गेला.

दुसरीकडे नेत्यांचा सत्कार करण्यासाठी सरसावलेल्या बाळासाहेब कराड यांच्या अडीच तोळ्याच्या सोनसाखळीवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे हल्लाबोल यात्रेत नेत्यांच्या भाषणापेक्षा चोरट्यांच्या सुळसुळाटाचीच जास्त चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.