सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलल्या : पवार
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2017 06:38 PM (IST)
‘सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलून घेतल्या. मात्र, सर्वसामान्य लोक रांगेत उभे राहिले.’ अशी जोरदार टीका पवारांनी केली.
नाशिक : ‘नोटाबंदीची गोष्ट म्हणजे मारुतीच्या बेंबीसारखी झाली आहे. झटका सगळ्यांना बसला पण सुरुवातीला कुणी मान्यच केलं नाही.’ असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला. ते नाशकात किसान मंचाच्या शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानाच्या समारोपावेळी बोलत होते. ‘सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलून घेतल्या. मात्र, सर्वसामान्य लोक रांगेत उभे राहिले.’ अशी जोरदार टीका पवारांनी केली. तसंच सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं जेवण असल्याचा टोलाही त्यांनी मारला. ‘देशातील सध्याच्या परिस्थितीची किंमत ही सगळ्यांनाच मोजावी लागते आहे. शेतकऱ्यांना ती सर्वाधिक मोजावी लागत आहे.’ असंही शरद पवार यावेळी म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुनही पवारांनी सरकारला धारेवर धरलं. इंधनच्या दरवाढीतून सरकारने लूट सुरु केली आहे. अशी टीका यावेळी पवारांनी सरकारवर केली. दरम्यान, याआधीही शरद पवार यांनी सरकारवर नोटाबंदीबाबत वारंवार टीका केली होती.