Sharad Pawar : जगामध्ये आमची किंमत वाढली त्याबाबत आनंद आहे, हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांची (PM Narendra Modi) किंमत जगात वाढली मला आनंद आहे, पण आमची द्राक्ष (Grapes) बांग्लादेशपण घेत नाही, हिच आमची किंमत, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 

 

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज सायंकाळी पार पडले, यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपल्या देशाची द्राक्ष परदेशात जातात. बांगलादेश, युरोप आणि अनेक भागांत जातात. महाराष्ट्राइतक्या असलेल्या बांगलादेशने कोणतीतरी ड्युटी लावली आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली द्राक्ष तिथे गेली नाही, माझ्याकडे पत्र आहे. देशाच्या राज्यकर्त्यांकडे शेतकरी जाऊन आले आणि बांगलादेशने लावलेली ड्युटी कमी करावी यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली. पण निकाल लागत नाही. पार्लमेंटमध्ये विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका केली. 

 

शरद पवार पुढे म्हणाले की, आजूबाजूच्या देशांत जे काही घडतंय, त्याची जबरदस्त किंमत देशाला, देशातील शेतकऱ्याला मोजावी लागतेय. सत्ताधाऱ्यांची भाषणं मी ऐकली. जगामध्ये आमची किंमत वाढली त्याबाबत आनंद आहे. हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांची किंमत जगात वाढली मला आनंद आहे. पण जगात किंमत वाढली आणि आमची द्राक्ष बांगलादेशपण घेत नाही. हीच आमची किंमत. याचा अर्थ हा की आम्ही स्वतःची प्रतिष्ठा ही महत्वाची समजतो. घाम गाळणाऱ्यांची प्रतिष्ठा आहे. त्यासाठी सत्तेचा उपयोग करत नाही. त्याचा परिणाम शेतीवर होत असल्याचे ते म्हणाले. 

 

साखरेची पण किंमत घसरली आहे. चारही बाजूंनी नुकसान आहे. आणि राज्यकर्ते धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नसतील, तयार नसतील तर काय अर्थ? आमच्याशी कोण संघर्ष करतील म्हणतात. पण तुमच्याशी आम्हाला संघर्ष करायचा नाही. आम्हाला काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला सन्मानाने संसार जगता येईल, एवढंच द्या हीच आमची भूमिका आम्ही घेतली आहे. दिवस अडचणीचे आहेत. आपण एकत्र राहू आणि परिस्थिती बदलू असं आश्वासन देखील पवार यांनी यावेळी दिले.

 

ऊसाचा धंदा अडचणीत

 

आज देशात आणि राज्यात साखरेचं उत्पादन अधिक झालं पण किंमत घसरली आहे. जग बदलतंय, आपल्याला इथेनॉल माहित नव्हते. जगाच्या काही भागांत इथेनॉलनंतर आता हायड्रोजनचे उत्पादन केलं जात आहे. आज हिंदुस्थानात कुठेही कारखान्यात हायड्रोजनचे उत्पादन झाले नाही. ऑस्ट्रेलिया, युरोपमध्ये मी काही जणांना पाठवलं असून माहिती गोळा केली जात आहे. आज ऊसाचा धंदा अडचणीत आला आहे. साखरेला उठाव नाही. अनेक कारखान्यांत साखर शिल्लक आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा मी अध्यक्ष असून माझ्याकडे जगभराची माहिती येत असल्याचे पवार म्हणाले.

 

सुधीर तांबेंची उपस्थिती

 

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज सायंकाळी पार पडले. यावेळी मंचावर छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे नुकतेच काँग्रेसमधून निलंबित होऊन महाविकास आघाडीच्या निशाण्यावर राहिलेले आमदार सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी देखील यावेळी हजेरी लावल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.