नाशिक : रोईंग म्हणजेच नौकानयन क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या दत्तू भोकनळने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. त्याने 650 पैकी 344 गुण म्हणजेच 52.92 टक्के मिळवले आहेत.


नाशिकच्या तळेगाव-रोही मध्ये राहणाऱ्या दत्तूने लासलगावच्या दत्ताजी पाटील हायस्कूलमध्ये परीक्षा दिली होती. सहा वर्षांपूर्वी दहावीनंतर दत्तू लष्करात दाखल झाला. त्यानंतर त्याने रोईंग खेळात प्राविण्य मिळवलं.

रोईंगमध्ये कारकीर्द सुरु झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षण घेणं शक्य झालं नाही. अखेर सहा वर्षांच्या विरामानंतर दत्तूने बारावीची परीक्षा दिली.

रिओ ऑलिम्पिकमध्ये दत्तूने रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात गटात 6 मिनिटं आणि 54.96 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून तेरावं स्थान मिळवलं होतं. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला.

मूळचा नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील तळेगाव-रोही या छोट्याशा गावचा रहिवासी असलेल्या दत्तूने लष्करात दाखल झाल्यावर रोईंगला सुरूवात केली होती. तळेगाव रोहीसारख्या दुष्काळी गावात पाण्याची उपलब्धता नसताना दत्तू भोकनाळ याने रोईंगची निवड केली आणि त्यात प्राविण्य मिळवत ऑलिम्पिक गाठलं.

संबंधित बातम्या :

नाशिकचा ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ बारावीच्या परीक्षेला


रोईंगपटू दत्तू भोकनळची गावात जंगी मिरवणूक


रिओ ऑलिम्पिक: रोईंगपटू दत्तू भोकनळ पदकाच्या शर्यतीतून बाहेर