तीन सप्टेंबर रोजी नाशिकजवळच्या आडगावात राहणाऱ्या शरद साळवे यांचा मृत्यू झाला होता. अपघातात आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचं शरदच्या पत्नीनं सगळ्यांना सांगितलं. मात्र शरदच्या आई-वडील, भाऊ यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार केली.
आडगाव पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केल्यावर शरदची पत्नी राणी साळवे आणि तिचा मित्र अनिल ताठे यांचं वागणं संशयास्पद असल्याचं त्यांना आढळलं. पोलिस मागावर असल्याचं समजताच अनिल ताठे फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध लावून त्याला ताब्यात घेतलं.
पोलिसी खाक्या दाखवताच राणी साळवेच्या सांगण्यावरुनच तीन तारखेच्या रात्री शरदची त्याच्या राहत्या घरीच हत्या केल्याची कबुली आरोपी अनिल ताठेने पोलीसांकडे दिली. शरदच्या उजव्या कानाखाली वजनदार हत्याराने वार करुन त्याचा खून केला आणि मग पुरावा नष्ट करुन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं दाखवत अंत्यसंस्कार केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.