रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या कारणावरुन मनसेने 2008 मध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केलं होतं. या प्रकरणात राज ठाकरे यांना मुंबईत अटकही झाली होती. राज यांच्या अटकेच्या निषेधार्थ इगतपुरी येथील मुंबई आग्रा-महामार्गावर असलेल्या एका परप्रांतीय हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. राज ठाकरे यांच्या चिथावणीनंतर हे आंदोलन झाल्याचा आरोप होता.
या प्रकरणी इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर इगतपुरी न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. यामधील सहा संशयितांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता केली होती, मात्र पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांचं नाव या खटल्यात होतं. 18 डिसेंबर 2018 रोजी राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात उपस्थित राहिले होते. त्यावेळी न्यायालयाने राज ठाकरेंना जामीन मंजूर केला होता. मात्र या प्रकरणात कुठलाही पुरावा न मिळाल्याने राज यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.