नाशिक: राज्यातील महापालिकेसंदर्भांत एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून मनपा चार सदस्यीय रचना रद्द करण्यात आली आहे. या माध्यमातून शिंदे- फडणवीसांनी महाविकास आघाडीला चांगलाच दणका दिला आहे. याचा फायदा भाजपला होणार असल्याने पक्षाने आता पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र पुन्हा एकदा निवडणुकीची जय्यत तयारी केलेल्या प्रशासनाला पहिले पाढे पंचावन्न करावे लागणार आहे. 


एकीकडे गेली वर्ष दीड वर्षांपासून रखडलेली नाशिक मनपा निवडणूक तयारी सुरू आहे. यापूर्वी प्रभाग रचना,  मतदार यादी, आरक्षण सोडत सर्व काही सुरळीत असताना आज अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभाग रचना रद्द केल्याचे सांगितले. पूर्वीची म्हणजे 2017च्या निवडणुकीत अवलंबण्यात आलेली त्रिसदस्यीय रचना पुन्हा लागू करण्यात आली आहे.


दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 2017 च्या निवडणुकीनंतर बदल करून प्रथमच त्रिसदस्यीय पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यंदा नाशिक मनपा निवडणुकीत अकरा नगरसेवकांची वाढ होऊन 133 वर आली. तसेच याप्रमाणे आरक्षण सोडत, महिला आरक्षण, प्रभाग रचना आणि अंतिम मतदार यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे पुन्हा चार सदस्य प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. पुन्हा तीन सदस्य प्रभाग रचना झाल्याने नाशिक मध्ये पुन्हा 122 नगरसेवक संख्या राहणार आहे.


भाजपला चार सदस्यीय रचना पोषक
दरम्यान चार सदस्य प्रभाग रचना ही भाजपला पोषक असल्याचे दिसून येते.  2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत याच पद्धतीने निवडणूक झाल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपचे तब्बल 66 नगरसेवक निवडून आले होते. मात्र 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय नाट्य रंगले होते. तर महाविकास आघाडीचे सरकार निर्माण झाल्यानंतर त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती.