नाशिक: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. नाशिकमधील मालेगाव तालुक्यात तर लोक दोन महिन्यांपासून पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.


पाऊस पडावा यासाठी सुमारे 50 हजार मुस्लिम बांधवांनी आज मालेगावातील ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करत दुवा मागितली.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव,येवला,चांदवड या तालुक्यात पावसाने दोन महिने उलटले तरी पुरेशी हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊन, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ही दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी,भरपूर पाऊस पडावा यासाठी मालेगावच्या ईदगाह मैदानावर सुमारे 50 हजार मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.

मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माइल यांच्या मार्गदर्शनाखाली ही नमाज अदा करण्यात येऊन, शेवटी अल्लाकडे दुवा मागत प्रार्थना करण्यात आली.