नाशिक : नाशिकमध्ये सध्या डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू सारख्या आजारांनी थैमान घातलं आहे. पण त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची चांगलीच चंगळ झाली आहे, तर शाळांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. कोणत्याही शाळेतल्या कोणत्याही मुलाला सर्दी-पडसं झालं तरी तीन दिवस सुट्टी देण्याचं फर्मान नाशिक महापालिकेने काढलं आहे.


नाशिक शहरातल्या कोणत्याही शाळेतल्या कोणत्याही मुलाला सर्दी-ताप आला, तरी तीन दिवस सुट्टी देण्याचे आदेश नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. नाशिक शहरात आलेल्या साथीच्या आजारामुळे महापालिका आता रिस्क घ्यायला अजिबात तयार नाही.

स्वाईन फ्लूने वर्षभरात नाशकात 35 जण दगावले. गेल्या दीड महिन्यात 27 जणांचा बळी गेला आहे. डेंग्यूमुळे 500 लोक आडवे झाले आहेत. पण त्यावरचा उपाय हा शाळांना अवास्तव वाटतो. यातून दांड्या मारणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी भीती शाळांना वाटते.

पोरांना सुट्ट्या मिळणार असल्यामुळे शाळांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पोरांनी प्लॅनिंगही सुरु केलं आहे. महापालिकेने काळजीपोटी निर्णय घेतला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुद्दाम दांड्या मारु नयेत, अन्यथा एकेदिवशी लांडगा.. आला रे आला होईल.