Nashik Firecrackers Banned : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वसामान्यांसह दुकानदारही दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात फटाक्याच्या दुकानांसाठी गाळ्यांचं वाटपही सुरु झालेय. सर्व तयारी  सुरु असतानाच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. आयुक्त गमे यांच्या या प्रस्तावामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना जाणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. प्रदूर्षण रोखण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी फटाक्याविना साजरी करावी लागण्याची चिन्हे आहेत. विभागीय आयुक्तांच्या या पत्रानुसार नाशिक, धुळे, जळगाव,  नंदुरबार व नगर जिल्ह्यात ठराव झाल्यास दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करावी लागणार आहे.


विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक, धुळे, नगर, जळगांव, नंदुरबार जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून यंदा फटाक्यावर निर्बंध घालण्यात यावेत, अशी सूचना केली आहे.  दिवाळीत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते. यामुळे प्रदूर्षण मोठ्या प्रमाणावर होते. दिवाळीत होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यावर बंदी आणण्याचे आदेश, आयुक्त गमे यांनी दिले आहेत.


महापालिकांनी महासभेत ठराव करून फटाक्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी आपल्या पत्रात दिले आहेत. जर नियमित महासभेत ठराव न झाल्यास यासाठी विशेष सभा बोलविण्याची सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली आहे. विभागीय आयुक्तांच्या या आदेशामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या प्रारूप टूलकीटनुसार  हवेची गुणवत्ता राखण्यासाठी 15ऑक्टोबरच्या आधी ठराव मंजूर करुन २२ ऑक्टोबर पर्यंत त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध होणे आवश्यक असल्याचं आयुक्तांनी आपल्या पत्रात दिल्या आहेत.  फटाके विक्रीसाठी स्टोल उभारण्याची मनपाने तयारी केली असताना विभागीय आयुक्तांच्या पत्राने  प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तसेच यामार्फत येणाऱ्या उत्पनालाही मुकावे लागणार आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. आता  राज्य अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्थचक्राला झळाळी मिळेल असं वाटलं होतं. अशातच दिवाळीत फटाक्यावर बंदी घातल्यामुळे व्यापार वर्गाच्या नाराजीलाही सामोरं जावं लागणार आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


ठाकरे सरकारचं मिशन 'दिवाळी'; मुख्यमंत्री आज महत्वाची घोषणा करण्याची शक्यता