शेतकरी, कष्टकऱ्यांचं लाल वादळ पुन्हा मुंबईत धडकण्याची चिन्हे, आंदोलक लेखी आश्वासनावर ठाम
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2019 08:02 AM (IST)
किसान सभेचा लॉंगमार्च सकाळी 9 वाजता निघणार असल्याची घोषणा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

नाशिक : मुंबईत पुन्हा एकदा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं लाल वादळ धडकण्याची चिन्हं आहेत. किसान सभेचा मोर्चा पुन्हा मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. काल मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र आंदोलक लेखी आश्वासनावर ठाम आहेत. दरम्यान, मोर्चेकरी शेतकऱ्यांनी कालची रात्र नाशिक-मुंबई महामार्गावरच घालवली. किसान सभेचा लॉंगमार्च सकाळी 9 वाजता निघणार असल्याची घोषणा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. मागण्या मान्य करण्याबाबत लेखी हमी देण्याची मागणी किसान सभेने केली आहे. सरकारने लेखी दिले तर आंदोलन कुठेही मागे घेऊ, असेही किसान सभेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सरकार लेखी देण्यास तयार असून मागण्याच्या बाबत सरकार सकारात्मक आहे. उद्या लेखी देणार असून मोर्चावर मार्ग निघाला आहे. उद्या मोर्चा काढण्याची गरज पडणार नाही असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.