Devendra Fadnavis on st strike :  एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटीच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग सुचवला असून सरकारने निर्णय घ्यावा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे एसटीचे विलीनीकरण सध्या तरी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. ही बैठकही कोणत्याही निर्णयाविना संपली होती. 


एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज देवेंद्र फडवणीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्यसरकारची भूमिका जीवघेणी आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग मी सुचवलाय, निर्णय राज्यसरकारला घ्यायचा आहे. 


पंतप्रधान मोदींचे कौतुक 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता, मात्र सर्वाना कृषी कायद्याचे महत्व पटविण्यात कमी पडले. लोकशाहीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच कामे केली नसल्याचे फडणवीस यांना म्हटले. या टीकाकारांची भूमिका दुटप्पी असून टीकाकारांना जनताच उत्तर देईल असेही फडणवीस यांनी म्हटले. 


कागद-पेन घेऊन देवेंद्र यांनी अनिल परबांना समजावले


देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांना देवेंद्र फडणवीस यांनी संपावर तोडगा काढण्यासाठी  एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगावे, तसे कागद पेन घेऊन समजावून सांगितले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रवासी कर कमी केल्यास सरकारकडून फक्त 100 कोटी घ्यावे लागतील असे देवेंद्र फडणवीस यांनी परब यांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून तुम्ही बोलून घ्या, आम्हीदेखील बोलून घेऊ असेही देवेंद्र यांनी अनिल परब यांना म्हटले. शरदराव रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा बिनविरोध करावी यासाठी अनिल परब देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आले होते, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला: संजय राऊत


अकोल्यात 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढण्यासाठी भाजपची व्यूहरचना


Vidhan Parishad : भाजपचे उमेदवार जाहीर; मुंबईतून राजहंस सिंह, नागपूरातून बावनकुळे तर सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिक रिंगणात


 


TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha