नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. असं असताना आज पहाटे 6 वाजता नाशिक शहरात आज तूफान वाहतूक कोंडी बघायला मिळाली. मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईसह ठाणे, पालघरहून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशकडे जाणारे परप्रांतीय नागरिक मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतत असून या वाहनांमुळे पहाटेच्या सुमारास मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


धक्कादायक म्हणजे यातील अनेक वाहनांवर महाराष्ट्र शासन, मेडिसिन्स, अत्यावश्यक सेवा, भाजीपाला असे स्टिकर्स लावले असून या वाहनांमध्ये परप्रांतीय नागरिकांना अक्षरशः कोंबले गेले आहे. यासोबतच अनेक ट्रकच्या टपावरही जीव धोक्यात घालून नागरिक बसलेले दिसून आले आहेत. एकंदरीतच सर्रासपणे अशी ही अवैध वाहतूक सुरु असून पोलिस तसेच कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात का येत नाही? की त्यांच्या आशिर्वादानेच हे सर्व सुरु आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


दरम्यान लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिकहून काल मध्यरात्रिपासूनच एसटीची मोफत सेवा सुरु करण्यात आली. ही सेवा सोमवारपासून सुरु होणार होती मात्र नाशिकमध्ये कालपासूनच सुरु करण्यात आली. रात्री  नागपूरसाठी एक,  जिंतूरसाठी एक तर 38 बसेस मध्य प्रदेशच्या सीमेकडे रवाना झाल्या. नाशिक शहरातून 36 तर इगतपुरीहून 4 बस सुटल्या आहेत. मुंबई- आग्रा महामार्ग वरून पायी जाणाऱ्या नागरिकांची पोलिसांच्या मदतीने परिवहन महामंडळाने तात्काळ व्यवस्था केली असल्याची देखील माहिती आहे.

राज्याने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. काल 1165 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी हजाराच्या घरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही 20 हजार 228 इतकी झाली आहे. तर, एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद काल झाली. काल तब्बल 48 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे काल 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात 3800 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली होती.