नाशिक : नाशिकच्या रामकुंडात अरुणा आणि गोदावरी या दोन नद्यांचा संगम असल्याचे अनेक दाखले दिले जातात. मात्र हीच अरुणा नदी गायब झाल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलं आहे. महापालिकेच्या अभिलेखावर अरुणा नदीचा उल्लेखच नाही.


माहिती अधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांनी याबाबत माहिती मागवली असताना महापालिकेच्या अभिलेखावर अरुणा नदीचा उल्लेखच नाही. ज्या दोन नद्यांच्या संगमामुळे रामकुंडाला धार्मिक महत्व प्राप्त झालं, त्यातील अरुणा नदीचं अस्तित्वच महापालिकेने नाकारल्याचं समोर आलं आहे.

अनादी काळापासून रामशेज किल्ल्यावर उगम पावणारी नदी इंद्रकुंडात येते. तिथून तिचा प्रवास रामकुंडाच्या दिशेने होतो, असे दाखले बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटरमध्ये आहेत. एका गोमुखाद्वारे अरुणानदीचं पाणी रामकुंडात येतं. मात्र, इंद्रकुंडाच्या पुढे नदीचा प्रवास दिसत नाही.

नदीवर रस्ता बांधण्यात आल्याने नदी नाहीशी झाल्याचा आरोप केला जात आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबवला जाणार आहे. त्या अंतर्गत गोदावरी काठाचा विकास होणार आहे. त्यातील काही निधी गोदावरीची उपनदी असणाऱ्या अरुणा नदीवर खर्च करावा, उगमापासून रामकुंडापर्यंतच्या प्रवाहाचा शोध घ्यावा आणि नदीचा श्वास मोकळा करावा अशी मागणी होत आहे.