Sanjay Raut : भारतीय जनता पक्षानं (BJP) इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केलीय का? असा खडा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी नसल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. आज ते मुंबईकडे रवाना होणार आहेत, त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली.


तुम्ही कर्नाटकच्या 'आरे'ला 'कारे' कधी करणार?


कर्नाटकच्या आरेला कारेनं उत्तर देऊ, असे वक्तव्य भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली, कर्नाटक महाराष्ट्रात घुसलंय, तुम्ही त्यांच्या 'आरे'ला 'कारे' कधी करणार? असा सवाल राऊतांनी यावेळी केला. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षांची आहे. तुम्हाला उद्यापर्यंत दिसेल विरोधी पक्ष काय करणार ते असेही ते म्हणाले. 


विरोधी पक्षसुद्धा लवकरच भूमिका जाहीर करणार 


महाराष्ट्राची जनता ही ताकद आहे. उदयनराजे भोसले असतील किंवा संभाजीराजे छत्रपती असतील ते आपापल्या पद्धतीनं जागरुकता निर्माण करत आहेत. विरोधी पक्षसुद्धा लवकरच त्यासंदर्भात आपली भूमिका जाहीर करेल. उद्या किंवा परवा याबाबत आम्ही बोलू असेही राऊत यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत भाजपचे लोकं जी अभद्र भाषा वापरतात ते लोक शिवसेनेच्या बाबतीतही अभद्र बोलू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना यांचे एक नातं आहे. त्याच्यामुळं जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं बोलतात ते आम्हाला काय सोडणार असेही राऊत म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले होते प्रसाद लाड


छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी लाड यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.  
  
महत्त्वाच्या बातम्या:


Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात, भाजपच्या प्रसाद लाड यांचं वक्तव्य; राष्ट्रवादीचा जोरदार हल्लाबोल