Ajay Boraste on Shantigiri Maharaj : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) गुंता महायुतीत (Mahayuti) अजूनही सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. दररोज इच्छुकांची नवनवीन नावे समोर येत आहेत. त्यातच शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) शिवसेना शिंदे गटाकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.    


अजय बोरस्ते म्हणाले की, शांतीगिरी महाराजांनी नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ही गोष्ट अनाकलनीय आहे. शिवसेनेत अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर करण्याचा संपूर्ण अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आहे आणि अशा पद्धतीचा कुठलाही संकेत नाशिक शिवसेनेला मिळालेला नाही.


शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीचा निर्णय आमच्यापर्यंत आला नाही 


शांतीगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती नाही. मात्र मी शांतीगिरी महाराजांना भेटून विनंती केली होती की, आपले आशीर्वाद हे महायुतीच्या उमेदवाराला लाभू द्या. कारण आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करायचे आहेत. त्यामुळे आपले आशीर्वाद माहायुतीच्या उमेदवाराला मिळावेत, अशी विनंती मी त्यांना केली होती. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीबाबतचा कुठलाही निर्णय शिवसेना पक्षातून अधिकृतपणे आमच्यापर्यंत आलेला नाही. 


शिवसैनिकांनी विश्वास ठेवू नये - अजय बोरस्ते 


शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. याबाबत अजय बोरस्ते यांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्याकडे आतापर्यंत असा कुठलाही अधिकृत निर्णय आलेला नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर शिवसैनिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केली. 


काय म्हणाले हेमंत गोडसे ? 


यावर हेमंत गोडसे म्हणाले की, कुठल्याही उमेदवारी अर्जाला एबी फॉर्मची आवश्यकता असते. ए फॉर्मवर नेत्याची सही आवश्यक असते. नाशिकच्या जागेबाबत सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. नाशिकच्या जागेबाबत उद्या संध्याकाळपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...