नाशिक: नाशिकसह (Nashik News) जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे शहरातून मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नुकताच राज्यातील मुलींच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर नाशिक शहरात देखील मुलींचे बेपत्ता होणे चिंतेची बाब समोर आली आहे. 


नाशिक शहरात मारहाण, खून, दरोडे, प्राणघातक हल्ले या राजरोसपणे घडत आहेत. या घटनांची नोंद पोलिसांत होत असून दिवसाढवळ्या होत असल्याने नागरिकांमध्ये देखील याबाबत माहिती होत असते. मात्र सोबत मुली बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे. रोज दोन ते तीन मुली बेपत्ता होत असल्याने हा गंभीर मुद्दा बनला आहे. नाशिक पोलिसांच्या रोजच्या दैनंदिन गुन्हे अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. 


दरम्यान राज्यातील महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची बाब पुढे आली असतांनाच नाशिक शहरात जानेवारी ते 8 मे 2023 या कालावधीत तब्बल 956 मुली व महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक नोंद पोलीस आयुक्तालयाकडे झाली आहे. दरम्यान 956 पैकी 221 अल्पवयीन मुली आहेत. तर 18 वर्षांपुढील महिला तब्बल 735 आहेत. पोलिसांना अवघ्या 31 अल्पवयीन मुलींचा शोध लागला बेपत्ता आहे. उर्वरित बेपत्ता मुली व महिलांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मध्यवर्ती गुन्हे शाखेसह पोलीस ठाणेनिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.


राज्यात दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये 390 ने वाढ झाली आहे. राज्यात दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असून, बेपत्ता होणाऱ्या मुली 18 ते 25 वयोगटातील आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्येही बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याची बाब समोर आली आहे. 


दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही आहे. नाशिक शहरात देखील प्रमाण अधिक आहे. बेपत्ता झालेल्या मुली अल्पवयीन असतील तर पोलीस अपहरणाची नोंद केली जाते. दरम्यान मुली अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख जाहीर केल्या जात नसल्याने त्याची स्वतंत्र नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर नाही. मात्र, सज्ञान मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे. बेपत्ता मुली व महिलांच्या नातेवाईकांनी नाशिक शहर पोलिसांनी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, यासाठी अनेक मुलींचे कुटुंबियांनी पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळत असल्याचेही समोर आले आहेत. 


नेमकी कारणं काय? 


राज्यात दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याची संख्या वाढते असून, हे चिंताजनक आहे. त्यानुसार बेपत्ता होण्याची काही कारणे देखील समोर आली आहेत. नोकरी, लग्न, कौटुंबिक कलह, सोशल मीडियाचा अतिवापर, प्रियकराकडून लग्नाचे अमिष, विवाहबाह्य संबंध, प्रेमाची आमिष दाखवून मुलींची दिशाभुल केली जात असून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जाता आहेत.


हे ही वाचा :


Maharashtra News: धक्कादायक! राज्यात रोज सरासरी 70 तरुणी होतायत बेपत्ता, मार्च महिन्यात 2200 मुली गायब