नाशिक : नाशिकचे निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असते. मात्र अनेकदा पर्यटकांकडून नियमाची पायमल्ली होऊन अनुचित प्रकार घडतात. त्यामुळे प्रसिद्ध हरिहर किल्ल्यावर (Harihar Fort Closed For Tourist)  तीन दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी येथे प्रसिद्ध हरिहर किल्ला दृष्टीस पडतो. वर्षभर या किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी असते. मात्र पावसाळ्यात ती अधिकच असते. अशावेळी पर्यटक नियमाची पायमल्ली करतात. अनेकदा निसरड्या आणि अरुंद वाटांमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता बळावते. या पार्श्वभूमीवर नाशिक वनविभागाने पुढील दिवस म्हणजे 17 जुलैपर्यत हरिहर किल्ल्यावर पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. 


त्र्यंबक तालुक्यातील हरिहर गडावर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. या गडाची वाट अतिशय अरुंद आहे त्यामुळे वाढलेल्या गर्दीमुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पावसाचा जोर अधिक असल्याने निसर्ग खुलून गेला आहे. परिणामी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा ओघही वाढला आहे. मात्र अनेकदा पर्यटक हुल्लडबाजी करताना आढळून येतात. खबरदारीचा उपाय म्हणून हरिहरगडाची वाट बंद करण्यात आल्याची माहिती नाशिक वन विभाग व वन उपसंरक्षक पश्चिम भाग पंकज गर्गे यांनी दिली आहे.


हरिहर गडावर पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. काही दिवसांपूर्वी यासंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे एकूणच येथील गर्दी लक्षात घेता अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गर्गे यांनी सांगितले . येत्या 17 जुलै पर्यंत नागरिकांनी हरहर गडावर व परिसरात नागरिकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये जर कोणी या ठिकाणी बंदी काळात प्रवेश करेल त्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही वन विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढे तीन दिवस कोणी हरिहर गडावर पर्यटनासाठी येऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या :


Nashik Bhivtas Waterfall : एक हजार फुटांवरून कोसळणारा भिवतास धबधबा, सुरगाण्याचे डोळ्यांत भरणार निसर्ग सौंदर्य


Nashik News : आता नाशिककरांना तिरुपतीचेही दर्शन घेता येणार, स्पाइसजेटची ‘कनेक्टिंग’ सेवा, असे आहे वेळापत्रक