नाशिक : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाहीच. मात्र आधीच ओबीसी समाजाला (OBC Reservation) आरक्षण खूप कमी आहे, त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या आणि हे मत माझं एकट्याचे नाही, इतर अनेक नेत्यांचे हेच मत आहे, त्यामुळे इतरांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाही? मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला नाहीतर, त्याला राजकीय वास येईल, असे प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन चांगलेच पेटला असून आता उपोषणकर्ते मनोज जरांगे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यानिमित्त बोलत असून त्यांनी छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला. याच टीकेचे प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण देता कामा नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, नाना पटोले, अशोक चव्हाण यांचं सुद्धा तेच मत आहे. मग मला एकट्याला का बोलता, माझ्या हातात काय आहे? ही सगळी मंडळी त्याच मताची आहेत, हे मला त्या जरांगेना सांगायचं, तुम्ही त्यांची नाव घेऊन बोलत का नाही? इशारे काय द्यायचे ते जरुर द्या, मात्र हि सगळी मंडळी त्याच मताची आहेत. या मताच्या विरोधात कुठला राजकीय पक्ष किंवा नेता आहे, हे सांगावे, असे आवाहन भुजबळांनी केले. 


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षणा संदर्भातील कायदा केला, त्यावेळी आमचा सुद्धा पाठिंबा होता. दुसरीकडे ओबीसी घटकाला आरक्षण कमी असून लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे पावणेचारशे जाती आहेत. 17 टक्के आरक्षण शिल्लक राहिलेले आहे, त्यांना वेगळे आरक्षण द्या, त्यात काही अडचण झाली आहे, ती दूर करा, एवढंच माझं म्हणणं आहे. शिवाय हा माझे एकट्याचे मत नसून सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. विदर्भातील जो कुणबी समाज आहे जो ओबीसी मधून मोडतो यांनी देखील  मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये म्हणून आंदोलन केले. आता मग त्यांच्याविरुद्ध बोला त्यांनी उपोषण केले, त्यांनी उठाव केला. मी गेल्या अनेक वर्षांपासून मागासवर्गीयांसाठी लढण्याचं काम करत आहे, मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा इतरांच्या बाबतीतही बोला नाहीतर त्याला राजकारणाचा वास आल्याशिवाय राहणार नाही. 


लेझर आणि डिजेमुळे अनेकांना त्रास 


छगन भुजबळ कांदा प्रश्नावर म्हणाले की, मी सुरवातीपासून कांदा व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचे आव्हान करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पहावे. आम्ही आमच्या स्थरावर प्रयत्न केले आहेत. व्यापाऱ्यांनी आता जास्त हट्ट करणे योग्य नाही. सरकारच्या कामात कोणी अडथळे आणत असतील तर पोलीस कारवाई करतील. दुसरीकडे नाशिक शहरातून डोळ्यांच्या संदर्भातील तक्रारी समोर आल्या. यावर ते म्हणाले की, मी आधी या विषयावर बोललो असतो तर धर्म विरोधी आहे, असे आरोप झाले असते. यापूर्वीही लेझर आणि डिजे मुळे अनेकांना त्रास झाला आहे. लोकांना जर इजा होत असेल तर सर्वांनी याचा विचार करायला पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. 


इतर महत्वाची बातमी : 


Manoj Jarange : ऐतिहासिक विजय जवळ आलाय, सरकारला सुटका नाहीच; नांदेडच्या सभेतून जरांगेंचा इशारा