नाशिक : आरक्षणासाठी (Maratha Reservation) दोन-तीन समाज आग्रही असून जातीचा प्रश्न असल्याने लोकांचा असंतोष वाढत जातो. कुणबी असणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जातं. हा प्रश्न का सुटत नाही, मला माहित नाही. मराठा हे कुणबी आहे, हे सूर्य प्रकाशाइतकं सत्य आहे. मग एक शासन निर्णय काढायला काय हरकत आहे? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसेच नोकरी हा विषय सोडला, तर आरक्षणाची गरज काय? सध्या नोकरी म्हणजे पैसा हे समीकरण बनलेले असल्याने आरक्षणाला महत्व असल्याचे बच्चू कडू (Bachhu Kadu) म्हणाले. 


नाशिकमध्ये (Nashik) दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' हे अभियान राबविण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज आमदार बच्चू कडू कार्यक्रमाला उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बच्चू कडू यांनी सुरवातीलाच मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या राजकारणावरून सरकारचे कान टोचले. ते म्हणाले की, मराठा (Maratha) समाज बांधवांना ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे, विदर्भातील सगळे मराठा हे ओबीसीमध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील 75 टक्के मराठा हे ओबीसी आहेत. फक्त आठच जिल्ह्यांत विरोध का, मला कळत नाही. मराठा हा मुलुख आहे. त्यात मराठा लिहिणं सुरू केलं. त्यांचे मूळ कुणबी आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाढवून द्यावे. नोकरी हा विषय सोडला, तर आरक्षणाची गरज काय? असा सवाल उपस्थित करत सध्या नोकरी ही पैसेवाली झाली आहे, म्हणून आरक्षणाला महत्त्व आहे. एकदा आमदार झाला की, नोकरी मिळाली की मरेपर्यंत व्यवस्था होऊन जाते. दुष्काळाची झळ कधी अधिकारी आणि आमदारांना लागली का? म्हणूनच आरक्षण मागणी वाढत आहे, याचं कारण म्हणजे नोकरी अस एकूण गणितच बच्चू कडू यांनी उलगडून दाखवलं. 


अजित पवार (Ajit pawar) यांच्या कालच्या विधानावर बच्चू कडू म्हणाले की, लहान आंदोलन कधी तरी अधिकाऱ्याच्या चुकीमुळे चिघळून जाते, असं कधी घडतं..असं कुणी म्हणत नाही की, लाठीमार करा, गोळीबार करा, पण जबाबदारी तर सरकारचीच आहे असे बच्चू कडू म्हणाले. तसेच सध्या विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते पदाची भूमिका बजावत आहेत. मात्र या अगोदर तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, आता विजय भाऊ यांची काय गॅरंटी आहे? या पाच वर्षात जे पक्षांतर झाले, ते मागच्या पन्नास वर्षात झालं नाही, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. तसेच काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाशिक दौरा केला. यावर बच्चू कडू म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्यात क्षमता आहे, यात मला काही शंका नाही. पंकजा ताई यांच्यात किती क्षमता आहे, हे त्यांनी तपासून पहावे. स्वतःचे दहा पंधरा आमदार असतील, तर मग आम्हीही युती करू पंकजा ताई यांच्यासोबत अशी ऑफर देत 'लोकं तुम्ही जमा केली, पण लोकांचे कामंही करावे लागतात', त्यांनी मनावर घेतले, तर त्या करूही शकतात असा टोलाही लगावला. 


लाठीचार्ज होणं अतिशय दुर्दैवी घटना 


एकनाथ खडसे यांच्या आरोपावर उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले की, हे दोन प्रवाह असून विरोधी आणि सत्तेतले. त्यांना असं वाटतं का, माफी नाही मागितली पाहिजे आणि महाराष्ट्र भडकू दिला पाहिजे होता? राजकारण करण्याचे ताळमेळ नेत्यांमध्ये राहिले नाही असेही ते म्हणाले. तसेच सद्यस्थितीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून यावर केंद्रीय मंत्री भारती पवार दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावर बच्चू कडू म्हणाले की, माझं असं मत आहे, कायमस्वरुपी तोडगा काढावा, असं एकही वर्ष नाही, की नुकसान होत नाही. तसेच सामानातून सातत्याने टीका होत आहे, यावर ते म्हणाले की, जालना येथील आंदोलन शांत होतं, अधिकाऱ्याच्या चूकीमुळे हे झालं. यावर कुणी राजकारण करू नये. उपोषणाच्या ठिकाणी लाठीचार्ज होणं, ही पहिलीच घटना आहे. हा अधिकाऱ्याने केलेला मूर्खपणा असल्याचे बच्चू कडू म्हणाले. तर इंडिया शब्द वगळण्याचे प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा आहेत. यावर ते म्हणाले की, भारताला तीन तीन नावं आहे. एकच नाव असायला हवं. महाआघाडीवाले मूर्ख आहे. भाषण करायचं की, या सभागृहात बसणारे सगळे इंडियावाले आहे, जे मत मारतात, ते भारतवाले आहे. भारत म्हणजे गोरगरीब, अशी एक प्रतिमा आहे, इंडिया म्हणजे ऐशोआराम, अशी संकप्लना बच्चू कडू यांनी मांडली. 


इतर महत्वाची बातमी : 


Maratha Reservation: सरकारचं शिष्टमंडळ औरंगाबादेत दाखल, ताफा अंतरवाली सराटी गावाकडे रवाना