नाशिक : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत! राज्यात होणाऱ्या शांततामय आंदोलनास आम्हा सर्वांचा पाठींबा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 


जालना (Jalana) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी (Maratha Kranti Morcha) पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून संभाजीराजे छत्रपती, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील सरकारवर रोष व्यक्त करत घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील घटनेचा आढावा घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, "मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत." 


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, "काल जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधव शांततेत आंदोलन करत होते. त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्या व बळाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. काल झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची ठाम भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तसे निर्देश दिले आहेत. मी राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो व या लढाईत आम्ही सारे मराठा आंदोलकांसोबत आहोत, असे आश्वासित करतो!" छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 



अनेक राजकीय नेते घटनास्थळी 


दरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर गोंधळ उडून हिंसक आंदोलनात रुपांतर झाल्याचे समोर आलं. या घटनेमुळे राजकीय नेत्यांनी सरकारवर रोष व्यक्त केला असून अनेकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी गावात जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे देखील आज घटनास्थळी जाऊन आंदोलकांना भेटणार आहेत. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Protest : नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटना आक्रमक; जालना घटनेच्या निषेधार्थ आंदोलन