नाशिक : एकीकडे मराठा आंदोलन (Maratha Protest) पेटलं असताना अनेक समाजाकडून आरक्षण मागणीसाठी (Maratha Reserevation) आंदोलन केले जात आहे. ओबीसींसह धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असून अनेक ठिकाणी आमरण उपोषण करण्यास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये (Nandgaon) धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. जीव गेला तरी बेहत्तर पण आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या चौदा पंधरा दिवसांपासून लढा देत आहेत. आज याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) अजित पवार उपोषणस्थळी जाणार आहेत. जरांगे यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला असून या कालावधीत सुद्धा आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिला. दरम्यान मराठा आंदोलनाची धग महाराष्ट्रात पेटत असताना आता इतरही समाजांकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अनेक आंदोलन सुरु आहेत. यात धनगर समाज देखील पुढे आला आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. 


मराठा आरक्षण पाठोपाठ आता धनगर समाजाला (Dhangar Aarakshan) आरक्षण द्या अशी मागणी पुढे येवू लागली असून या मागणीसाठी नाशिकच्या नांदगावात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने नाशिकच्या (Nashik) नांदगावमध्ये जुना तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी 'धनगरांना आरक्षण मिळालंच पाहिजे, कोण म्हणतंय देत न्हाय, घेतल्याशिवाय राहत नाय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं' अशी जोरदार घोषणाबाजी शासनाच्या विरोधात करण्यात आली. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. कोणतेही सरकार येवो, आमच्याकडे लक्ष देत नाहीत, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यत आम्ही इथून उठणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर पण आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. 



अहमदनगर जिल्ह्यातही आंदोलन 


धनगर आरक्षणप्रश्री महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील चोंडीत सुरू असलेल्या आंदोलन सुरु आहे. धनगर आरक्षणप्रश्री चोंडीत सुरू असलेल्या उपोषणाकडे सातव्या दिवशीही कोणताही उच्चपदस्थ अधिकारी किंवा सरकारमधील मंत्री फिरकले नसल्याचे चित्र आहे. तर उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. याच ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या किरण धालपे, प्रेम आगुणे, स्वप्निल नेमाणे, बाळा गायके, ॲड. रणजित कारंडे या 5 तरुणांनी मुंडण केले. या उपोषण आंदोलानाची सरकार दखल घेत नसल्याने, धनगर समाजबांधवांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, असे यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे यांनी सांगितले. धनगर समाज आरक्षणप्रश्नी येत्या काळात राज्यभरात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : गावातून गवऱ्या, लाकडं गोळा केली, सरण रचलं, आरक्षणासाठी नाशिकच्या शेतकऱ्याचे सरणावर आमरण उपोषण