नाशिक: नाशिक-मुंबई महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या मार्गावरील नवीन कसारा घाटात रात्री उशीरा हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेला कंटेनर पुढे असणाऱ्या 4 कारना जाऊन धडकला. यामध्ये एका कारच्या बोनेटचा पार चुराडा झाला आहे. या भीषण अपघातामध्ये (Nashik Accident) तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरच्या धडकेने एका कारच्या पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावपथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, याठिकाणी विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली. अपघातानंतर कंटेनर चालक आणि कारमधील मुलगा जखमी अवस्थेत गाडीतच अडकून पडले होते. अखेर एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर या दोघांनाही महामार्ग पोलिस आणि रूट पेट्रोलिंग पथकाने बाहेर काढले. या दोघांचीही प्रकृती गंभीर होती. त्यांना तातडीने उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.


गेल्या काही दिवसांपासून कसारा घाटात (Kasara Ghat) सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अवघड वळणांवर ट्रक आणि कंटेनरचे अनेक अपघात झाले आहेत. कालदेखील कंटेनरचा ब्रेक फेल झाला. हा कंटेनर नाशिकवरुन मुंबईच्या (Mumbai News) दिशेने येत होता. या अपघातानंतर नाशिक-मुंबई महामार्गावर (Mumbai Nashik Highway) प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना बाहेर काढल्यानंतर ही वाहतूक कोंडी कमी करताना महामार्ग पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. 


आणखी वाचा


ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकला, फरफटत गेला, रोहा स्थानकात अंगावर काटा आणणारा अपघात


समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?