Nashik News : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाची (Rain) प्रतीक्षा अजूनही आहे. दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात रविवारपासून पाऊस विश्रांती घेणार असल्याची स्थिती आहे. कारण हवामान खात्याकडून कुठलाही इशारा पुढील आठवडाभर दिलेला नाही. 


राज्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात पुरपरिस्थिती उद्भवली आहे. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने नाशिकला हुलकावणी दिली आहे. ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  शनिवारी दिवसभरात हलक्या सरींचा दुपारी काही मिनिटांचा शिडकाव्याचा अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली होती. दुपारी नागरिकांना सूर्यदर्शनही घडले. दरम्यान, गंगापूर धरणातून (Gangapur Dam) शुक्रवारी करण्यात आलेला विसर्गही शनिवारी थांबवण्यात आला.


दरम्यान काल दिवसभरात शहरात केवळ 1 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. नाशिक शहरात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु होती. गुरुवारी आणि शुक्रवारीही पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली होती. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 24 तासांत केवळ 4.3 मिमी पावसाची नोंद शहरात करण्यात आली. गरुवारी दिवसभरात 5.6 मिमी इतका पाऊस मोजला गेला होता. गेल्या मंगळवारी 8.9 मिमी इतका त्या आठवड्यातील सर्वाधिक पाऊस शहरात झाला. या हंगामात अद्यापपर्यंत शहरात केवळ 217 मिमी इतका पाऊस झाला आहे.


धरणांचा विसर्ग घटला


गंगापूर धरणातून शुक्रवारी 539 क्युसेकने विसर्ग गोदावरीत करण्यात आला होता. मात्र, शनिवारी दुपारी 1 वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णत: विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग थांबवण्यात आला. त्याचप्रमाणे दारणा धरणातूनही होणारा विसर्ग कमी करण्यात आला असून, शनिवारी संध्याकाळी थेट 1250 क्युसेकवर आणण्यात आला. तसेच नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुरु असलेला विसर्गही शनिवारी रात्री दहा वाजता 3 हजार 155 क्युसेक करण्यात आला.


नाशिकला दमदार पावसाची प्रतिक्षा


पावसाचा दुसरा महिना उलटत चालला असून अद्यापही नाशिक जिल्ह्यावर पावसाची अवकृपा असल्याचे चित्र आहे. मात्र इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर , सुरगाणा, पेठ आदी तालुक्यात बरा पाऊस असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. भात लावणीची लगबग सध्या या तालुक्यात सुरु आहे. पण तरीही नाशिक शहरासह इतर तालुक्यात अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून नाशिककरांना सध्या मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik News : गंगापूर धरणातून पहिल्यांदा 539 क्यूसेकने विसर्ग सुरू, त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार, नाशिकवर अवकृपाच