PM Kisan Yojna : पंतप्रधान किसान योजनेसाठी (PM Kisan Yojna) लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्याचे ई केवायसी (e-KYC) करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिले आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एकूण खातेदार शेतकऱ्यांपैकी 52 टक्के शेतकऱ्यांच्या ई केवायसी झाल्याने सुमारे 48 टक्के शेतकऱ्यांचे ई केवायसी अद्यापही बाकी असल्याचे समोर आले आहे. 


देशातील शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र शासनाने (Central Government) पंतप्रधान किसान योजना राबविण्यात येत आहे. त्यात साधारण चार महिन्याला 2000 याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाते. त्यानुसार सगळ्या खातेदारांचे सातबारा खाते आणि बँक खाते जोडले आहे. मात्र त्यात अनेकांचे खात्यांची केवायसी झालेली नाही. 


नाशिक जिल्ह्यात एकूण साडेचार लाखाच्या आसपास पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र  यापैकी दोन लाख 18 हजार खातेदार शेतकऱ्यांचेच ई केवायसी झालेले आहे. त्यातच आता केंद्र शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केवायसी असणे आवश्यक केल्याने यापुढे ई केवायसी करणे गरजेचे ठरणार आहे.


देशात सगळ्या जिल्ह्यांना शासनाने सूचना दिल्या असून बहुतांश भागात 15 ऑगस्टला अखेरचा हप्ता जमा झाला आहे. मात्र त्याचवेळी 31 ऑगस्ट पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करावे लागणार आहे.  त्यासाठी जिल्हा यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच राज्यात तलाठी व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर प्रशासकीय यंत्रणेला 100 टक्के शेतकऱ्यांची एकेवायसी करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. 


केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आता शेतकऱ्यांची ई-केवायसी गरजेचे आहे शासनाने 100 टक्के ई केवायसी करण्याचे ठरवले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकारी केवायसी करून घ्यावेत असे आवाहन गंगाथरण डी यांनी केले आहे.


तहसीलदारांकडून आवाहन
पी.एम.किसान  लाभार्थी यांना आवाहन करण्यात येते की,आपण दिनांक 31 ऑगस्ट 2022 पूर्वी इ-केवायसी (E-KYC) करून घ्यावे. पी.एम.किसान लाभार्थी यांनी 31  ऑगस्ट 2022 च्या पूर्वी E-KYC न केल्यास आपणास पुढील हप्ते मिळणार नाही . E-KYC करण्याकरिता लाभार्थी यांनी नजीकच्या सेतू केंद्र , महा-ई सेवा केंद्र, CSC सेंटर मध्ये आधार कार्ड, मोबाईल घेऊन तात्काळ जावे असे आवाहन तालुका प्रशासना मार्फत करण्यात येत आहे .


असे करा ई केवायसी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या संकेतस्थळावर जाऊन फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये जाऊन केवायसी करता येणार आहे. ग्राहक सेवा केंद्रावर ई केवायसी प्रमाणीकरण बायोमेट्रिक पद्धतीने करता येणार आहेत. यासाठी बँक खाते आणि आधार कार्ड आवश्यक असणार आहे.