Nashik Conservation : गोदावरी नदीचे (Godavari River) उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या तसेच पर्यटनासाठी लाखो भाविक भेट देत असलेल्या त्र्यंबकेश्वरचे 97 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकच्या (Trimbakeshwer) ब्रम्हगिरी पर्वताला सुरक्षा कवच मिळालं असून त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवण चा काही भाग संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. 


नुकतेच महाराष्ट्र सरकारने वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ (Conservation Forest)  हा दर्जा बहाल केला असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसह कळवण आणि इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीसह 97 किलोमीटर, यामध्ये वाघेरा, वरसविहीर, गोरठाण, आंबोली, वेळुंजे, अंबई, काचूर्ली, कळमुस्ते, उभाडे, आळवंड, मेटघर किल्ला, चंद्रयाची मेट, अस्वली हर्ष, हर्षवाडी, आव्हाटे, वाढोली, कोजुली, पाहीन, भिलमाळ, त्र्यंबकेश्वर आदी परिसर संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यात त्र्यंबकच्या मागील बाजूस ब्रम्हगिरीला सुरुंग फोडण्याचे काम सुरु होते. यास आता आळा बसणार आहे. या निमित्ताने ब्रम्हगिरीला एकप्रकारे कवच मिळाले असून भूमाफियांच्या चोरीला चाप बसणार आहे. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी ब्रह्मगिरी (Bramhgiri) पर्वताच्या मागील बाजूस सुरू असणाऱ्या अवैध उत्खनन बाबत एबीपी माझाने आवाज उठविला होता. त्या बातमीनंतर या भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीं होती. यानंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली होती. मात्र आता यावर राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेत ब्रहमगिरी पर्वताला प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवणचा देखील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने आता प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही उत्खनन करता येणार नसल्याचा निर्वाळा या निर्णयाने होणार आहे. 


निसर्ग प्रेमींच्या लढ्याला यश
गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी भागात होणाऱ्या उत्खननावर निसर्गप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर हा विषय कोर्टापर्यंत गेला होता. यासाठी पर्यावरण प्रेमींनी सातत्याने लढा दिला होता. तर जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासह वनमंत्री, वन सचिव आणि सर्व प्रेमींची बैठक पार पडली होती. निसर्गप्रेमींच्या बैठकीनंतर आता यावर शासनाने राजपत्राद्वारे सूचना काढत त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास शंभर चौरस किलोमीटर परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार आता त्र्यंबकेश्वरच्या परिसरासह ब्रह्मगिरी आणि गंगाद्वारचा परिसर देखील संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे ब्रह्मगिरीचे जतन आणि गोदावरीचे पावित्र्य वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मधील पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला अखेर यश आले आहे.


त्र्यंबकेश्वरसह कळवण, इगतपुरीचा समावेश 
त्र्यंबकेश्वरसह कळवण तालुक्यातील गुजरातलगतच्या भागासह 84.12 चौरस किलोमीटर संरक्षित क्षेत्र जाहीर झाले आहे. त्यात गुजरात राज्याच्या हद्दीला लागून सुरू होणाऱ्या कळवण क्षेत्रात संरक्षित क्षेत्रात समावेश झाला आहे. कळवण तालुक्यातील देसरणे, रळवजी, नाकोडे, एकलहरे, वाडी, बालापूर, जामळे, ढेकाळे यांसह 28 गावांतील क्षेत्राचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यातील 88.49 चौरस क्षेत्राचा परिसर संरक्षित म्हणून जाहीर झाला आहे. यामध्ये भावली, सातुरली, ओंडली, नागोसली वालविहीर, धारगाव, चिंचले खैरे त्रिंगलवाडी,पिंपळगाव भटाटा, धानोर्ली आडवण, टाके घोटी, बलायदुरी, बोरटेंभे पारदेवी, गिरणारे, टीटोली, इगतपुरी (शहरी), आवळखेड, तळेगाव, तळोशी भावली, कुरुंदवाडी, काळुस्ते आदी परिसर संवर्धन क्षेत्रात समावेश झाला आहे.