Nashik Accident : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Agra Highway) धुळे ते शिरपूर (Dhule) दरम्यान गव्हाणे फाट्यांना भीषण अपघातात नाशिकच्या (Nashik) चौघांसह एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरपूर येथे कानुबाईचा उत्सव आटोपुन नाशिककडे येत असताना हा भीषण अपघात झाला. 


नाशिकच्या सिडको (Nashik Cidko) परिसरात राहणारे संदीप चव्हाण हे पत्नी मीना आणि दोन मुलीसह एक मुलगा असे कुटुंब कार घेऊन शिरपूर येथे शालक दशरथ नाना कोळी यांच्याकडे कानुबाई मातेच्या उत्सवासाठी आले होते. आज उत्सवातून ते कारने नाशिकला घराकडे निघाले होते. दरम्यान गव्हाणे फाट्याने नजीक पुलावरून खाली उतरताना त्यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरवर धडकली. त्यात कारमध्ये बसलेले चव्हाण दापत्य व चालक गणेश चौधरी हे गंभीर जखमी होऊन ठार झाले तर ट्रॅक्टर खाली दुरुस्तीचे काम करणारा चालक पांडुरंग माळी हे देखील जागीच ठार झाले. 


दरम्यान या अपघातात चव्हाण कुटुंबातील तीन मुलांसह एक मुलगा हे देखील गंभीर जखमी झाले होते. तर गंभीर रित्या जखमी झालेले चव्हाण कुटुंबाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना संदीप चव्हाण, मीना चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर काही वेळानंतर अपघातात जखमी झालेली मुलगी जान्हवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


तर मुलगा गणेश व दुसरी मुलगी साक्षी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची मृत्यूची झुंज सुरू असल्याचे समजते आहे. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चूराडा झाला आहे. संदीप हे पंचवीस वर्षापासून उत्तम नगर भागात कुटुंबीयांचं वास्तव्यास होते कार चालून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. एकाचा कुटुंबातील तिघे तर इतर दोघांचा मृत्यू झाल्याने उत्तम नगर, म्हसरूळ या दोन्ही उपनगरांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोककळा पसरली आहे. 


वाढते अपघातांचे प्रमाण 
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक दिवस किरकोळ अपघातापासून ते भीषण अपघात सर्रास घडताना दिसत आहेत. एकीकडे वाहन चालवितांना रस्ते प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. मात्र ते पाळले जात नसल्याचे समोर येते. अनेकदा अपघात होण्यामागे मानवी चुका मोठया प्रमाणांवर आहे. तर बऱ्याचदा त्याचप्रकारे रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, सूचना फलक नसणे अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे रस्ते अपघातांकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून दिसून येते.