Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकेवर काढत असून वारंवार खुनाच्या (Murder), चोरीच्या, हाणामारीच्या घटना समोर येत आहेत. अशातच शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तात्काळ कुमक पाठवून तासाभरानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 


नाशिकच्या गंजमाळ परिसरात (Nashik Ganjmal) दोन गटात तुफान हाणामारीची घटना समोर आली असून एकमेकांवर दगडफेक केल्याने काही वेळ परिसरात दहशत पसरली होती. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस पथक पाठविले. जवळपास तासाभरानंतर हा वाद सोडविण्यात पोलिसांना यश आले. दगडफेकीची घटना आणि रस्त्यावर जमलेल्या गर्दीने वाहतुक कोंडी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. तर दगडफेकीत एका रिक्षाचेही नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर पोलिसांच्या तासाभराच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.


नाशिक शहरातील गंजमाळ पंचशील नगर भागात दोन गटात मागील भांडणाची कुरापत काढून दोन गटात हाणामारीची घटना झाली. या हल्ल्यात दोन्ही बाजूंच्या गटांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून संशयितांचा शोध सुरू असून सात जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्याने व्यावसायिकानी दुकाने त्वरित बंद केली तर परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण कायम होते. 


दरम्यान दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर विरोधी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ पोलीस ठाण्यात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीचे दगडफेकीत रूपांतर झाले. यावेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त तांबे, संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी भद्रकाली पोलीस ठाणे गाठले होते. 
त्यामुळे गंजमाळसह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


घटनांना आळा बसावा अशी मागणी .. 
दरम्यान गंजमाळ परिसरात यापूर्वी देखीलदोन गटात अनेकदा वाद झाल्याचे समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांना आळा बसावा. यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असताना त्यांच्यासमोर संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर वाद घालत एकमेकांवर दगडफेक केली जात असल्याने पोलिसांना काही काळ सुरक्षित जागेवर जावे लागले.  भद्रकाली पोलिसांनी दोन्ही गटातल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.