Nashik Election : सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडींनी चर्चेत असलेली नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduate Constituency) निवडणूक आणखी चुरशीची झालेली आहे. कारण या निवडणुकीमध्ये स्वराज्य संघटनेने (Swarajya Sanghatana) आपला उमेदवार उभा केला आहे. सुरेश पवार (Suresh Pawar) यांना स्वराज्य संघटनेने पुरस्कृत केलं आहे. शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा स्वराज्य संघटनेचे केला असून प्राथमिक चर्चा देखील सुरू झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर निवडणूक मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच या निवडणुकीत स्वराज्य संघटनेने उडी घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्वराज्य संघटनेने उमेदवार सुरेश पवार यांना पाठिंबा दिला असून आता भाजप आणि शिंदे गटाकडे पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कारण देशातल्या महत्वाचा पक्ष असलेल्या भाजपने अद्यापही नाशिक पदवीधारच्या निवडणुकीत आपला पत्ता खोलला नसल्याने भाजप नेमकी काय भूमिका घेतंय, याची सर्वांंनाच उत्सुकता आहे. तर दुसरीकडे स्वराज्य संघटनेने उमेदवार सुरेश पवार यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपसह शिंदे गटाला साकडे घातले आहे. 


यावेळी संघटनेचे प्रवक्ते करण गायकर (Karana Gaikar) म्हणाले की, नाशिक पदवीधर निवडणुकीत सगळे उमेदवार अपक्ष असून कालपर्यंत वाट बघत होतो की, अपक्ष उमेदवार असणाऱ्या तांबे यांना भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना या दोघांपैकी कोणीतरी पाठिंबा देतील. पण तसं काही अद्यापही घडलं नाही. शेवटचे दोन दिवस उरल्याने मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्याही बोलणे झाले आहे. सकारात्मकपणे चर्चा करून आमचा उमेदवार कसा सक्षम आहे हे त्यांना पटवून दिले, भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष असून नाशिक पदवीधर निवडणुकीत बाहेर राहू नये, म्हणून भाजप पक्षाला विनंती करण्यात आली आहे की, उगाचच एखाद्याच्या मागे जाण्यापेक्षा, आम्ही तुमच्या दारात येतोय, आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या आणि एक चांगला उमेदवार तुम्ही सभागृहात घेऊन जा, अशी विनंती संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 


शेतकऱ्यांच्या मुलाला पाठिंबा द्या... 


ते पुढे म्हणाले की, स्वतः संभाजीराजे छत्रपती महाराज (Sabhajiraje Chatrapati) 28 तारखेला नाशिकला येत आहेत. त्याचबरोबर छत्रपतींना सगळ्या निवडणुकीची पार्श्वभूमी सांगितली असून संभाजीराजे छत्रपती आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते नाशिकमध्ये येत असल्याने महत्वाचा निर्णय होईल. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करू की, फडणवीस यांच्याशी संवाद साधून आपला उमेदवार जर त्यांच्या पाठीमागे निवडून येत असेल तर आमची तयारी पूर्ण झालेली आहे.


स्वराज्य संघटनेच्या ताकदीवर उमेदवार निवडून येईल, अशी 100 टक्के खात्री असून भाजपची मदत झाली तर चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. सहज निवडणूक होऊन जाणे, हे आमचं धोरण आहे. उमेदवारी चर्चा केली होती. त्यादिवशी यांच्या सगळ्या घडामोडी चालू होत्या. आम्ही निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून होतो. दोन दिवस राहिले कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि एवढे मोठे दोन्ही पक्ष निवडणुकीतून बाहेर राहू नये. ज्या उमेदवारानं देशाच्या पंतप्रधानाच्या पोस्टरला काळे फासले अशा उमेदवाराला पाठिंबा देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलाला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी इतर पक्षांना केले आहे.