Nashik Chhagan Bhujbal : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandraknat Patil) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. 'त्या' एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडण सुरु असून शिवसेनेच्या फुटीसाठी सुद्धा ते कारणीभूत असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव घेता आरोप केला आहे. यावर भुजबळांनी चोख प्रत्युत्तर देत ठाकरे गट फोडण्यामागे तुम्ही आहात, तुम्ही भांडण लावलं, अशी कामे पवार करत नाहीत, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ (Chhaga Bhujbal) यांनी दिले आहे. 


आज छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) असून शरद पवार देखील दोन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज सकाळी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. भुजबळ म्हणाले की, "शिवसेना फुटली, या फुटीमागे कुणाचा हात आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन भावांमध्ये आम्ही नाही तर तुम्ही भांडण लावलं. अन् हे भाडं कुणी लावलं, हे देखील सर्वांना माहित आहे. असे काम पवार करत नाहीत.


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, "शरद पवार आज नाशिकमध्ये येत असून इंडियन प्रेस मजदूर संघांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार नाही. त्याचबरोबर उद्या देवळाली मतदारसंघात (Deolali) काही कार्यक्रम आहेत. निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या दौऱ्यात निवडणुकांची काही चर्चा होणार नाही." तसेच आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देशात सुरु असलेल्या हिंडेनबर्ग या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. यावर भुजबळ म्हणाले की, "आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करु नये, आपली बदनामी होता कामा नये. टाटा, बिर्ला यांनी देखील खूप चांगले काम केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, उद्योगपतींच्या बाबतीत कुठपर्यंत ताणून धरायचे? देशासह राज्यात इतर ही अनेक मुद्दे असून यावर चर्चा झाली नाही. मात्र काही लोकांना टार्गेट करण्यात आले. त्यांचे मत कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही." 


अनेक मुद्द्यांवर भुजबळांचे भाष्य 


यावेळी भुजबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत म्हणाले की, "भक्तिभावाने मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्याला जावे, राजकारण करु नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा असून शिंदेंवर फार मोठी जबाबदारी पडली आहे. मात्र दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार अजून होत नसल्याने अनेक नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, "अशा परिस्थितीत केसरकरांच्या वक्तव्याला महत्त्व नाही. फडतूस, काडतूस असे वक्तव्य होत आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेना (ठाकरे गट) युती होईल असे वाटत नाही." दुसरीकडे अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती. यावर ते म्हणाले की, "अचानक आजारी असल्याने अजित पवार यांनी दौरा रद्द केला. त्यांनी सांगितले आहे की मला त्रास झाल्याने दौरा रद्द करत आहे." ईव्हीएम बंद करण्याच्या भूमिकेवर ते म्हणाले की, "ईव्हीएम बंद करावे ही मागणी आमची पण आहे. अनेक देशांनी ईव्हीएम बंद केले आहेत. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली असून त्यामुळे निवडणुकांत ईव्हीएम मशीन वापरु नये."