Nashik Girish Mahajan : संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी बॉम्ब आणतात पण ते फुस्के निघतात. त्यांच्या जवळ बोलण्याशिवाय दुसरे काही नाही. मागच्या वेळी त्यांनी बॉम्ब तयार केला होता मात्र तो फुटला नाही, अशा आशयाचा टोला मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. 


मंत्री गिरीश महाजन हे नाशिक (Nashik) येथील खान्देश महोत्सवाला (Khandesh Mahotsav) उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे ते म्हणाले. नागपूर येथील अधिवेशनात आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून चिखलफ़ेक केली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी करत आज अधिवेशनात मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महानजन यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना टोला लगावला आहे. 


गिरिश महाजन म्हणाले,  संजय राऊत नेहमी बॉम्ब आणतात पण ते फुस्के निघतात. त्यांच्या जवळ बोलण्याशिवाय दुसरे काही नाही. मागच्या वेळी त्यांनी बॉम्ब तयार केला होता मात्र तो फुटला नाही, संजय राऊत फक्त आरोप करतात... यांनी एवढे पैसे खाल्ले, त्याने तेवढे खाल्ले, पण मला प्रश्न विचारू नका. त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत आज काय फुसका बॉम्ब फोडतात ते पाहूया, असेही ते म्हणाले. - फौज उभी करून, कार्यकर्ते उभे करून चौकशी वर परिणाम होणार नाही. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर अधिवेशनात आरोप केले आहेत. यावर महाजन म्हणाले,  जे सत्य आहे ते समोर येईल, मुख्यमंत्री यांच्यावरचे आरोप निराधार असून कोर्टाचे निकाल देखील समोर आले आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्याशिवाय राज्यात शिंदे फडणवीस सरकार यांचे उत्तम काम सुरू असून लोकांचे काम होत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी हतबल असल्याचे ते म्हणाले. 


अजित पवारांवर बोलताना ते म्हणाले कि, आंदोलन करणे, हाऊस चालू न देणे हे विरोधी पक्षाच काम असून हाऊसमध्ये ते बसले काय, नाही बसले काय  आमचे काम चालू आहे आमची संख्या जास्त आहे. आम्ही त्यांची मनधरणी करू, चर्चा करू, राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून विदर्भाचे प्रश्न मार्गी लावायचे आहे. या विषयांवर चर्चा झाली पाहिजे, जयंत पाटील यांचे निलंबन हा विषय धरून चालणार नाही. आमच्या 12 लोकांना निलंबित केलं होतं, मग आम्ही थोडी अस केलं. आम्ही देखील आलो नाही. आम्हाला कोर्टाने आत घेतले. जयंत पाटील जे बोलले ते चुकीचे त्याच समर्थन कोणीही करणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला. तसेच अंधारे यांच्या म्हणण्याला किती महत्त्व द्यावं, हा एक वादाचाच विषय आहे. आपली विचारसरणी काय.. आपण बोलतो काय? म्हणून अंधारे यांना काही बोलणार नाही. त्या रोजच काहीतरी बोलत असतात, त्यामुळे त्याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचे म्हणत अंधारेवर बोलणं टाळले. 


नाशिकच्या राजकारणावर म्हणाले... 
सद्यस्थितीत भाजप शहराध्यक्ष बाबत अद्याप तक्रार नाही. भाजपचे कार्यकर्ते गेलेच जे गेले ते शिंदे गटाचे असून भाजपाचे नाशिक शहरात काम चांगले आहे. शिवाय नाशिक शहराध्यक्ष बदलाबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे निर्णय घेतील. तसेच एकनाथ शिंदे यांना संजय राऊत मोठी मदत करत आहेत.  आधी 40 आमदार गेले, नंतर 12 खासदार गेले, आता नाशिकचे माजी नगरसेवकांनी शिंदे गटाचा रस्ता धरला. हे संजय राऊत यांच्यामुळे होत असून त्यांनीच पक्षाला सुरुंग लावल्याचे ते म्हणाले. 


विरोधी पक्षाला फक्त गोंधळ घालायचा आहे... 
पंढरपूर महाराष्ट्राची अस्मिता असून पंढरपूर किती अस्वच्छ आहे, तिथे किती घाणीचे साम्राज्य आहे. अस असताना वाराणसीच्या धर्तीवर विकास होतोय. तर त्याला गावकर्यांनी पाठिंबा द्यावा. दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्यावा. इतर देशात जसे कॉरिडॉर होतात, तसे पंढरपूरला झाले पाहिजे. असे महाजन म्हणाले. अधिवेशनावर बोलताना ते म्हणाले कि, या वेळेला विधानसभेत चिखल फेक जास्त झाली. राज्यातले 3 वर्ष वाईट गेले. उद्धव ठाकरे मंत्रालयाची पायरी चढले नाही. विरोधी पक्षाला स्वारस्य राहील नाही. त्यानंतर सत्ता गेली म्हणून विरोधक तडफडत आहे. मला 9 वेळा निलंबित केलं, मग मी हाऊस बंद पाडले का? जयंत पाटलांनी अध्यक्षांची लाज काढली, हे चुकीचे आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणावरून लक्षात येतंय कि, विरोधी पक्षाला फक्त गोंधळ घालायचा आहे, असे महाजन यांनी सांगितले.