Maharashtra Political Crisis : एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेले बंड, आणि त्यानंतर दहा दिवस चाललेला राजकीय वादंग, शिवसेनेनेत (Shivsena) पडलेली उभी फूट, या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thakaray) यांनी दिलेला राजीनाम्यानंतर मात्र शिवसैनिक एकाकी पडला असून राज्यभरात शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. 


शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांनी बंड पुकारून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या रूपाने राजकीय वादळ आले. मात्र हे वादळ शिवसेनेला खिळखिळं करेल असं वाटलं नव्हतं. मात्र गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय वादात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा दिला. या दहा दिवसांत शिवसैनिकांमध्ये कमालीचा असंतोष दिसून आला. अनेक भागात आंदोलने झाली. त्यात शिवसेना समर्थक व शिंदे समर्थक यांच्यात जुंपली. 


गेल्या दहा दिवसांच्या राजकीय नाट्यांमध्ये मात्र शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक एकटे पडल्याचे चित्र आहे. अनेक शिवसैनिकांनी तर पत्रे पाठवून शिवसेना शाबूत राहावी तिच्यात फूट पडू नये यासाठी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते तर ओक्साबोक्सी रडल्याचे आपण पाहिले. या सर्व गदारोळात मात्र खऱ्या अर्थाने शिवसैनिक भरडला गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. 


दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री तसेच आमदार पदाचा राजीनामा दिल्यानंतर तर अनेक कार्यकर्त्यांनी भावनिक होत हे चुकीचे झाल्याचे प्रतिक्रियाही दिल्या. काल सायंकाळी उद्धव ठाकरे हे विधानभवनातून निघाल्यानंतर कार्यकर्त्यांनी 'आम्ही तुमच्या सोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला एकटे सोडणार नाही, अशा शब्दांत शिवसैनिक, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे याना बोलून दाखविल्या. 


शिवसैनिक एकाकी 
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दहा दिवस उलटले. या सर्व घडामोडीत मात्र शिवसैनिक, कार्यकर्ता भरडला गेल्याचे पाहायला मिळाले. अनेक शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. मात्र या दहा दिवसांच्या सत्तानाट्यात शिंदे गटाला अनेक शिवसैनिक समर्थन देत होते, तर अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना समर्थन देत होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर हा पेच आणखीच वाढला असल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकूणच शिवसेनेत उभी फट पडल्यानंतर शिवसैनिक एकाकी पडला आहे. त्यामुळे काही वेळात घडणार आलेल्या महत्वाच्या घडामोडीनंतर शिवसैनिक कोणत्या बाजूने असणार हे स्पष्ट होईलच.