नाशिक :  नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022)  मत बाद झाल्याने चर्चेत राहिलेले नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघाचे शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande)  हे एकनाथ शिंदेच्या गटात आता सामील झाले आहेत. सुहास कांदे हे तसे नेहमीच चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व आहे.  महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील अनेक वाद हे सर्वश्रुत असून काही महिन्यांपूर्वीच भुजबळांविरोधात कांदे यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंकडे तक्रारही केली होती.  दरम्यान सुहास कांदे यांचा आजवरचा राजकीय प्रवास जाणून घेऊया. 



  • सुहास कांदे हे कुस्तीपटू असून त्यांनी एकेकाळी महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली होती. सामाजिक कार्य करतांना राजकारणाची गोडी लागलेल्या सुहास कांदेंनी 2006-07 साली मनसेत प्रवेश केला होता. 

  •  राज ठाकरेंचे एकेकाळी ते कट्टर समर्थक बनले होते. मनसे नाशिक जिल्हाप्रमुख आणि त्यानंतर प्रदेश सरचिटणीस म्हणून सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

  • मधल्या काळात सगळ्यांच्या सुख दुःखात धावून जाणारा माणूस यापाठोपाठ गुन्हेगारांना पाठीशी घालणारे नेते असे अनेक आरोपही त्यांच्यावर केले गेले होते. 

  • 29 नोव्हेंबर 2013 ला कांदे यांनी मनसेला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. 2014 साली नांदगाव विधानसभेत त्यांना उमेदवारी मिळाली होती मात्र छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता.  

  • 2019 साली पुन्हा एकदा सुहास कांदे यांना नांदगाव मतदार संघातून आमदारकीची उमेदवारी बहाल करण्यात आली. पंकज भुजबळ यांचा पराभव करत भगवा फडकवला होता आणि हाच पराभव भुजबळ कुटुंबियांना चांगलाच जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. 

  • काही महिन्यांपूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ हे निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला होता. हा वाद चांगलाच विकोपाला गेला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे देखील कांदे यांनी याबाबत तक्रार केली होती. 

  • जिल्हा बँकेच्या नांदगाव संचालकपदाची तसेच शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सुहास कांदे यांच्याकडे आहे. 

  •  आमदार झाल्यापासून त्यांची आणि एकनाथ शिंदेंची जवळीक अधिक वाढली होती आणि आता ते थेट त्यांच्या गटात सामील झाले आहेत. 

  • नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे वजनदार नेते म्हणून कृषी मंत्री दादा भूसेंपाठोपाठ सुहास कांदे यांचे नाव घेतले जाते.