नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashtra Assembly Elections 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकच्या चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात (Chandwad-Deola Assembly Constituency) उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून आहेर बंधूंमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळाली होती. आता या मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा नाफेडचे संचालक केदा आहेर (Keda Aher) यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


चांदवड-देवळा मतदारसंघात (Chandwad Deola Assembly Constituency) राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजपच्या (BJP) तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) व नाफेडचे संचालक केदा आहेर (Keda Aher) या दोघात भावात जोरदार रस्सीखेच दिसून आली. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक डॉ. राहुल आहेर हे भाजपचे आमदार आहे. यंदा मात्र त्यांना तिकिटासाठी त्यांचे बंधू नाफेडचे संचालक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याशी झुंज द्यावी लागत होती. केदा आहेर हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचत आहेत. तर गावागावातून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी बैठका सुरू करण्यात आल्या होत्या. यामुळे आहेर बंधूंमध्ये उमेदवारीवरून संघर्ष दिसून येत होता. 


डॉ. राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार 


आता चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. केदा आहेर यांना चांदवड-देवळा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. वरिष्ठांकडूनही या निर्णयाला संमती दिल्याचे देखील डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले आहे. चांदवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. 


आम्ही भावासाठी आमदारकी त्यागली : राहुल आहेर 


केदा आहेर यांनी दोन वेळा माझ्यासाठी चांदवड विधानसभेत 'त्याग' केला होता. कुटुंबात कलह, भाऊबंदकी निर्माण होवू नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यागले. आम्ही भावासाठी आमदारकी त्यागली. मी कुठल्याही मतदारसंघातून उमेदवारी करणार नाही, असेही डॉ राहुल आहेर यांनी स्पष्ट केले आहे. 


आणखी वाचा


विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला, 'त्यांचा मालकच भरकटलाय, आता चर्चेचा काय उपयोग?'