Girish Mahajan :स्वातंत्र्य दिन जवळ आला असताना नाशिकसह राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने ध्वजारोहणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हा प्रश्न सुटला असून आता मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्यातील ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादीच केली आहे. त्यानुसार नाशिक शहरात स्वातंत्र्य दिनाला मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास दीड महिना राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत होते. मात्र नुकताच राज्याचा मंत्री मंडळ विस्तार झाला असून यात 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  


दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा मात्र खातेवाटप झाले नसल्याने व संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री रिक्त असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागून होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढला असून संपूर्ण जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 


दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाला मंत्री गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे नाशिकच्या पालकमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तरही यानिमित्ताने मिळाले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक मंत्र्यांना एक जिल्हा देण्यात आला आहे. 19 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर असणार आहे. तर उर्वरित ठिकाणी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, अशी माहिती मिळाली आहे.


हे मंत्री करणार ध्वजारोहण 
देवेंद्र फडणवीस - नागपूर, सुधीर मनगुंटीवार - चंद्रपूर, चंद्रकांत पाटील - पुणे, राधाकृष्ण पाटील - अहमदनगर, गिरीष महाजन - नाशिक, दादा भुसे - धुळे, गुलाबराव पाटील - जळगाव, रविंद्र चव्हाण - ठाणे, मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर, दीपक केसरकर - सिंधुदुर्ग, उदय सामंत - रत्नागिरी, अतुल सावे - परभणी, संदीपान भुमरे - औरंगाबाद, सुरेश खाडे - सांगली, विजयकुमार गावित - नंदुरबार, तानाजी सावंत - उस्मानाबाद, शंभूराज देसाई - सातारा, अब्दुल सत्तार - जालना, संजय राठोड - यवतमाळ. तर अमरावतीमध्ये विभागिय आयुक्त तर कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलढाणा, पालघर आणि नांदेड याठिकी तेथील जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करणारे मंत्रीच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.