Girish Mahajan & Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शनिवारी (दि.22) रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी (दि. 23) नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela 2027) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शनही घेतले. तसेच कुशावर्त तीर्थाची पाहणी देखील केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी रात्री नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामास होते. तर मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन हे देखील काल सायंकाळपासून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी ते त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी निघत असतानाच मंत्री गिरीश महाजन हे पत्रकारांशी संवाद साधत होते.मंत्री गिरीश महाजन माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची वाट बघत असल्याचे दिसून आले. याबाबत माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन हे अक्षरशः धावत निघाले आणि मुख्यमंत्र्यांजवळ गेल्याचे पाहायला मिळाले. गिरीश महाजन यांच्या या कृतीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा महायुतीत सुटलेला नाही. नाशिकचा पालकमंत्री कोण होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा उद्योजकांच्या चर्चासत्रात याबाबत भाष्य केलंय. जोपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नाही, तोपर्यंत चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो. पण लवकरच नाशिकचे पालकमंत्री जाहीर करू, असे त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा कायदा तयार करणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकच्या कुंभमेळयाच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशने ज्याप्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि कुंभमेळा प्राधिकरण तयार केलं. त्याच धर्तीवर आपण देखील कायदा तयार करत आहोत. आपणही कुंभमेळा प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर चौकट देत आहोत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे. राज्य सरकार म्हणून आम्ही कुठल्याही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
आणखी वाचा