Chandrashekhar Bawankule नाशिक :  लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. जळगाव, रावेर, शिर्डी, नंदुरबार, पुणे, मावळ, बीड, अहमदनगर दक्षिण, छत्रपती संभाजीनगर , शिरूर, जालना या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. आज मतदान होणाऱ्या अकरा ही जागा महायुती जिंकेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला आहे.

  


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज मतदान होणाऱ्या अकरा ही जागा महायुती जिंकेल. पुढचा पाचवा टप्पा सुद्धा 2019 पेक्षा जास्त फरकाने आम्ही जिंकणार आहोत.  सुप्रियाताई पराभूत होत असल्यामुळे महाविकास आघाडीचा फुगा फुटणार आहे. 


मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही


पवार साहेबांनी महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा फुटणार आहे. ते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलले आहेत. राज्यातील दोन पक्ष संपणार आहेत. मशाल आणि तुतारी हे दोन पक्ष आता चार जूननंतर राज्यात दिसणार नाही, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 


पराभवाचे लक्षणं दिसतात, तेव्हा असे वक्तव्य करणं नॉर्मल


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचे त्यांनी म्हटले. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा पराभव होतो, पराभवाचे लक्षणं दिसतात, तेव्हा असे वक्तव्य करणं नॉर्मल आहे. हे ते बोलतच राहणार, पराभव जसा जवळ दिसेल, ईव्हीएम खराब आहे. मशीन खराब झाली आहे. मशीनमध्ये दोष आहे, असे आरोप ते करतील. परसेंटेजचा दोष सांगतात. निवडणूक निर्णय अधिकारी शेवटपर्यंत सांगत नाही.  यांना आता पराभव दिसत असल्याने असे लक्षण दिसत आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.  


महाविकास आघाडीची हवा निघून गेली


महाराष्ट्रात महायुतीला केवळ दहा जागा मिळतील, वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नितेश राणे बोलतात ते मी काही बोलणं योग्य नाही.  महाविकास आघाडीचा फुगा फुटला आहे. हवा निघून गेली आहे. संजय राऊत यांनी नाशिक महापालिका हद्दीतील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार, असा इशारा दिला. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांच्या शिवाय काही प्रश्न नाही का? बाकी प्रश्न सुद्धा आहेत. सकाळी ते बोलले म्हणून आम्ही बोलले पाहिजे असे काही नाही.  काही प्रश्न विकासाचे असतात. या भागातल्या डेव्हलपमेंटचे असतात, असे त्यांनी यावेळी म्हटले.  


आणखी वाचा 


Sanjay Raut: मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा, संजय राऊतांचा आरोप