Nandurbar News : मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 42 दिवस उलटून देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी अंत्यसंस्कार करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला आहे. मुलीवर बलात्कार (Rape) होऊन तिचा खून झाला असताना पोलिसांनी केवळ आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला. इतकंच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावरील अत्याचारांबाबत कोणतीही तपासणीच करण्यात आली नाही. त्यामुळेच या बापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे. 


नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील रहिवासी आंतरसिंग काल्या वळवी यांची विवाहित मुलगी रंजिला हिला वावी इथले रहिवासी रणजीत ठाकरे आणि अन्य एक जण बळजबरीने गाडीवर बसवून 01 ऑगस्ट 2022 रोजी गावाबाहेर घेऊन गेले. यानंतर तिला तिच्या नातलगाचा फोन आला. आपल्यावर रणजीतसह चार जण अत्याचार करत असून मला मारुन टाकतील, असं रंजिलाने फोनवरुन नातेवाईकाला सांगितलं. त्यानंतर काही वेळातच रंजिलाने वावी इथल्या एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन तिच्या कुटुंबीयांना आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह खाली उतरुन घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचं पोलिसांना सांगून देखील रंजिलाच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचं समोर आलं आहे. तिला फाशी दिली असून पोलिसांच्या मदतीने ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडिलांसह कुटुबीयांनी केला आहे. 


शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलिसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला आणि या प्रकरणात संशयित रणजीत ठाकरेसह तिघांना अटक केली. मात्र मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली असताना पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुलीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतरही आंतरसिंग काल्या वळवी यांनी अंत्यसंस्कार केले नाहीत. त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच आपल्या मुलीचा मृतदेह पुरला आहे. या साऱ्या कठीण प्रसंगात खडक्याचे ग्रामस्थ देखील वळवी कुटुंबीयासमवेत भक्कमपणे पाठीशी उभे आहेत.


या 42 दिवसात रंजिलाच्या वडिलांसह ग्रामस्थांनी धडगाव पोलीस स्टेशनसह थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. तर ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्र्याच्या कानावरही अंत्यसंस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. मुळातच मुलीच्या कुटुंबीयांची जर मागणी होतीच तर प्रशासनाने त्यापद्धतीने तहसीलदार अथवा न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीने तिचे शवविच्छेदन पुन्हा करणे क्रमप्राप्त होते. मात्र या साऱ्या प्रकरणात नेमकं पाणी कुठे मुरत आहे, असाच प्रश्न देखील उपस्थित होत आहे. दरम्यान पोलिसांनी याबाबत बोलताना तपासाच्या अनुषंगाने जे तथ्य समोर आले त्यानुसार अतिरिक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात फेरशवविच्छेदन करण्याच्या सूचना देखील त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. यानुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकारी यांना पत्र लिहून फेरशवविच्छेदनाची मागणी देखील केली आहे. 

रंजिलाच्या मृत्युआधी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपची तपासणी करुन त्यात जर तथ्य असेल तर त्याबाबतच पोलिसांनी आधीच ठोस पावले उचलणे गरजेचे होते. अशातच तिच्या आत्महत्या झालेल्या फोटोमधुन देखील काही तांत्रिक बाबी उपस्थित करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  त्यामुळेच शवविच्छेदन अहवालानंतर काहीही निघो, मात्र रंजीलाच्या घरच्यांची अतिशय साध्या आणि सरळ मागणीची दखल प्रशासन कधी घेणार हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.