Nanded Crime News : मागील काही दिवसांत खुनाच्या घटना वाढतांना पाहायला मिळत आहे. छोट्या-छोट्या आणि शुल्लक कारणावरून थेट हत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे माणसाच्या जीवाची किंमत संपली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अशीच काही घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यात समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादात दोघांनी गावातील एकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यातील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मारोती नागोराव जाधव (वय 38 वर्षे, रा. मंडगी, ता. देगलूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर मलिकार्जुन लक्ष्मण लोणे व श्रीनिवास निवृत्ती लोणे (रा. मंडगी) असे आरोपींचे नावं आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नांदेडच्या देगलूर तालुक्यातील मंडगी गावातील मारोती जाधव आणि मलिकार्जुन लोणे, श्रीनिवास लोणे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे अनेकदा ते सोबत राहत होती. गरज पडल्यास एकेमकांना पैसे देखील देत होते. दरम्यान एक महिन्यापूर्वी मयत मारोती जाधव यास श्रीनिवास लोणे यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु, मारोतीने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने लोणे याने वाद घातला. त्यामुळे यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. मात्र, गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्यातील वाद मिटविला होता. परंतु, श्रीनिवास लोणे यांच्या मनात राग कायम होता. 


दरम्यान, 29 जुलै रोजी मृत मारोती यांच्या घरी कोणीही नव्हते. याचाच फायदा घेत सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान दोन्ही आरोपींनी मारोतीच्या घरी येऊन त्यास मंडगी फाट्याकडे रोडने घेऊन गेले. त्यानंतर रात्री दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास हे दोन आरोपी परत येताना गावातील नागरिकांनी पाहिले. मात्र, त्यांच्यासोबत मृत मारोती नसल्याने त्यांच्यावर संशय बळावला होता. विशेष म्हणजे, मारोती जाधव हा रात्री घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी त्याची शोधाशोध सुरु केली. तेव्हा गावातील रोड लगत, पाण्याच्या डबक्याजवळ मारोती जाधव हा मृत अवस्थेत दिसून आला. त्याच्या डोक्यात, पाठीवर, कपाळावर मारून खून करण्यात आला होता. 


पोलिसांनी एक आरोपीला ठोकल्या बेड्या 


दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तत्काळ तपासाची चक्र फिरवली. यावेळी लोणे आणि मारोती यांच्यातील वादाची पोलिसांना माहिती मिळाली. तसेच, रात्री मारोतीला सोडून दोघेच परत आल्याची माहितीही गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी मलिकार्जुन लक्ष्मण लोणे यास पळून जाण्याच्या तयारीत असताना नरंगल येथून ताब्यात घेतले आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या: 


 Nanded : चालकाच्या एका हातात स्टिअरिंग तर दुसऱ्या हातात वायपर; एसटी बसचे आठवड्याभरात चार धक्कादायक व्हिडीओ व्हायरल