नांदेड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) ते मुंबई (Mumbai) अशी पायी दिंडी काढत मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. यासाठी 20 जानेवारीला ते आंतरवालीमधून मुंबईकडे कूच करणार आहे. दरम्यान, जरांगे यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची नांदेडच्या (Nanded)  नायगाव तालुक्यातील नरसी येथे येत्या 7 जानेवारीला भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ओबीसी जनमोर्चा आयोजित या ओबीसी सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेतून भुजबळ नेमकं काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नयेत आणि सरकराने स्थापन केलेली शिंदे समती रद्द करत त्यांच्याकडून वाटप करण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र देखील रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ, वंचितचे बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, विनय कोरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, टी.पी. मुंडे, बबनराव तायवाडे यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी होणाऱ्या या सभेतून भुजबळांच्या निशाण्यावर कोण असणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


सभेची अशी तयारी...


आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून या महामेळाव्याची तयारी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 45 जिल्हा परिषद सर्कलचे दौरे पूर्ण करण्यात आले आहेत. मेळाव्याच्या नियोजनासाठी 21 समित्या स्थापन केल्या आहेत. या मेळाव्याला जिल्हाभरातून लाखो ओबीसी समाजबांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, तब्बल पाच हजार स्वयंसेवक त्यासाठी नियुक्त केले आहेत. सोबतच, एक लाख पाणी बॉटल आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. 50 बाय 100 आणि 40 बाय 30 या आकाराचे दोन व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. यापैकी एका व्यासपीठावर शाहिरीचा कार्यक्रम चालणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. 


ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारने लेखी आश्वासन दिले 


मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी होत असतानाच तिकडे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मोठा दावा केला आहे. जालना येथील ओबीसी बांधवांचे उपोषण सोडण्यासाठी गेलेले बबनराव तायवाडे म्हणाले की, "ओबीसी प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने सरकारची 29 सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. यावेळी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासन सरकारने दिले आहे. सोबतच, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ असे सरकारने आजपर्यंत कुठेही असे म्हटले नाही. सरकारने आपल्याला दिलेला हा शब्द तीन महिन्यांपासून बदललेला नाही. त्यामुळे आम्हाला सरकारवर विश्वास आहे, असे बबनराव तायवाडे म्हणाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : 'वेडा झाला, काही दिवसांनी कागदं खाणार'; मनोज जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका